पुणे वंदे भारतला बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद
बेळगाव : काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. हुबळी-धारवाडपेक्षाही बेळगावमधून वंदे भारतला तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. नवरात्रीमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली असल्याने वंदे भारतचे तिकीटही वेटिंगवर असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार हुबळी-बेळगाव-पुणे मार्गावर वंदे भारत सुरू झाली. एकीकडे हुबळी-धारवाडसारखी मोठी शहरे असतानाही बेळगावमधून चारपट अधिक प्रवासी पुण्याला ये-जा करीत आहेत.
आठवड्यातून तीन दिवस असणाऱ्या वंदे भारतमुळे बेळगाव ते पुणे असा वेगवान प्रवास करता येत आहे. सकाळच्या वेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तर सायंकाळी पुण्याहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. वंदे भारत सुरू होऊन 15 ते 20 दिवस होत आले असून कमी कालावधीत बेळगावच्या प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे रेल्वेचे कमर्शियल डिपार्टमेंटही खुश आहे. सध्या नवरात्रीमुळे वंदे भारतच्या सर्व सीट फुल असल्याचे दिसत आहे. येत्या रविवारी तर वेटिंग लिस्ट लागल्याने या एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद लक्षात येत आहे. असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास रेल्वेला वंदे भारत नियमित करावी लागेल, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
आता प्रयत्न बेंगळूरसाठी
हुबळी-पुणे मार्गावर वंदे भारत सुरू होऊन त्याला उत्तम प्रतिसादही मिळू लागला आहे. त्यामुळे बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा विस्तार बेळगावपर्यंत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हुबळी-धारवाड मोठी शहरे असतानाही बेंगळूर वंदे भारतला तितकासा प्रतिसाद नसल्याचे चित्र वारंवार दिसून येत असल्याने ही एक्स्प्रेस बेळगावमधून सुरू झाल्यास निश्चितच प्रवाशांमध्ये वाढ होणार आहे.