‘तरुण भारत’कडून जनजागृतीचे उत्तम कार्य
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
दै. ‘तरुण भारत’ वेगवेगळे ज्वलंत प्रश्न वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आरोग्य, पर्यावरण अशा विविध विषयांवर जनजागृती करण्याचे उत्तम कार्य दैनिक तरुण भारत करत आहे. त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी चांगले कार्य चालूच ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा दैनिक तरुण भारत च्या चॅम्पियन विभाग व टीजेएसबी बँकेच्या सहकार्याने आयोजित विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी दौलतराव हवालदार, खास वत्ते म्हणून डॉ. प्रसाद देवधर, दैनिक ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर, दै. ‘तरुण भारत’ गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, जनरल मॅनेजर सचिन पोवार आणि टीजेएसबी बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अरुण भट उपस्थित होते.
गोव्याची शिक्षण क्षेत्रात प्रगती
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात गेल्या पाच वर्षांत शिक्षणक्षेत्रात प्रगती झाली असून, अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. इतर राज्यांमध्ये कुठेच इतक्या संधी उपलब्ध असणार नाही जितके 100 टक्के मार्ग शिक्षणक्षेत्रात गोव्यात आहेत. त्याच प्रमाणे ईव्हीएमद्वारे (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) शाळा, महाविद्यालांमध्ये प्रवेश देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. ज्याचा फायदा गोव्यातील मुलांना होत आहे, असे ते म्हणाले.
आदर्श ठेऊन ध्येय गाठण्यावर भर द्या
दहावी हा शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतरचे मार्ग मुलांनी विचारपूर्वक निवडणे गरजचे आहे. आज मुलं चांगले गुण प्राप्त करतात, परंतु सामान्य ज्ञानात, आर्थिक साक्षरतेत कुठे तरी कमी पडत आहेत. करिअरच्या अनुषंगाने चांगले गुण प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. परंतु याचबरोबर चांगली जीवनमूल्ये जोपासणेही गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक तऊण भारतचा चॅम्पियन विभाग व टीजेएसबी बँकेच्या सहकार्याने आयोजित या विशेष विद्यार्थी गुणगौरव सोहळ्dयात राज्यभरातील दहावीच्या एकूण 150 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्षमा नाईक यांनी केले.
शिक्षणासाठी सरकारतर्फे भरपूर प्रयत्न : तानावडे
आज राज्य सरकारतर्फे मुलांच्या शिक्षणासाठी भरपूर कष्ट घेतले जात आहे. ज्याचा फायदा घेऊन गोमंतकीय युवकांनी गोव्याचे भविष्य उज्ज्वल करणे गरजेचे आहे. दै. ‘तऊण भारत’ आणि टीजेएसबी बँकेने हा चांगला उपक्रम घडवून आणला आहे. कारण गोव्याचे भवितव्य गोव्यातील मुलामध्येच आहे. मुलांवरून आईवडिलांची ओळख निर्माण व्हावी ही आईवडिलांची इच्छा असते. त्यामुळे मुलांसोबत पालकही भरपूर कष्ट घेतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक गोष्टींपासून मुले वंचित राहत आहेत. आज मुलांनी स्वप्नं बघितली पाहिजे, ती साध्य करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजे. निस्वार्थी भावनेने कार्य केले तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही.
शिक्षित व्हाल, तरच प्रत्येक अंगानी विकास शक्य : किरण ठाकूर
आज गोव्यात शिक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. राज्यातील लोकसंख्या सुशिक्षित, सुसंस्कृत होणे काळाची गरज आहे. शिक्षणावर भर दिली तरच माणसाचा प्रत्येक अंगानी विकास शक्य होईल. आज अनेकजण अशिक्षित असल्यामुळे अनेक घटकांमध्ये कमी पडत आहे. त्यामुळे शिक्षित व्हा, भारताला बलशाली करण्याचे ध्येय साध्य करा, असा संदेश दै. ‘तऊण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी दिला आहे.
मुलांच्या यशात 50 टक्के वाटा पालकांचा : जावडेकर
मुलांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशात 50 टक्के वाटा पालकांचा असतो. त्यामुळे मुलांचा करण्यात येणारा गौरव खऱ्या अर्थाने पालकांचाही असतो. दहावीची परीक्षा हा मूलभूत पाया असतो. हा पाया मजबूत झाल्यानंतर पुढची इमारत मुलांनी बांधायची असते. कारण स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार हा माणूस स्वत:च असतो. आज मुलांनी चांगली पुस्तके, चरित्रे वाचणे गरजेचे आहे. ज्ञान माणसाला समृद्ध करते. आयुष्याला वेगळे वळण देण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. आज आमची मुले शिकतात आणि परदेशात जाऊन करिअर करतात. आपल्या देशात शिक्षण घेऊन देशाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे चांगले शिकून शिक्षक, पालकांचे, गोव्याचे आणि स्वत:चे नाव वर काढा, असे संपादक सागर जावडेकर म्हणाले.
... तर ‘सुशेगाद’पणा सोडा : डॉ. प्रसाद देवधर
गोमंतकीय लोकांना सुशेगाद या शब्दाने संबोधिले जाते. कारण गोमंतकीय थोड्याप्रमाणात सुस्त आहात. परंतु आयुष्यात पुढे जायचे असेल तर ‘सुशेगाद’पणा सोडणे गरजेचे आहे. कारण माणूस अनुकूलतेनुसार पुढे जात नसतो तर प्रतिकुलतेनुसार पुढे जात असतो. आज माणसाचे भावनिक निर्देश कमी होत चालले आहेत. त्यावर भर दिला पाहिजे. आयुष्यात कमी यश प्राप्त झाले तर चालेल परंतु खऱ्या बुद्धिमत्तेच्या मागे लागा. केवळ परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांमुळे नव्हे तर घरातून प्राप्त झालेल्या संस्कारातून मुले घडत असतात. पालकांनी केवळ आधुनिक गोष्टी मुलांना न देता चार चांगली पुस्तके आणून दिली पाहिजेत. तसेच दुर्बल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शोधून त्यांचा गौरव करणे गरजेचे आहे.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे युवकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम : हवालदार
आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे युवकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम होत चालला आहे. आणि त्यानुसार झालेले बदल युवकांनी स्वीकारलेले आहे. आज डिजिटल युग इतके पुढे गेले आहेत की ‘एआय’ सारखे तंत्रज्ञान जग चालविण्याच्या मार्गावर आहे. डिजिटल युगात आज दोन पिढीतील अंतर स्पष्टपणे दिसून येत आहे. मुलं आणि पालक यातील नातं आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे हरवत चालले आहे. त्यात मोकळ्या मनाने समोर बसून संवाद न साधणे, गंभीर विषयावर न बोलणे, एकाकीपणा, पालकांशी बोलताना मोबाइलचा वापर करणे, त्यांच्यासोबत वेळ न घालविणे अशा गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी खरोखरच पालकांना दु:ख देत असतात, असे दौलतराव हवालदार म्हणाले.