राज्यपाल पिल्लई गोव्याशी समरस!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशंसोद्गार : राज्यपालांकडून ‘अन्नधन’ योजनेतून गरजूंना मदत
पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यात गेली चार वर्षे समरसतेने आपले कार्य केले आहे. त्यांच्या योगदानामुळे आज कॅन्सरग्रस्त, गरजू लोकांना मदतीचा हात मिळत आहे. त्यांनी अभ्यास करून पुस्तकातून गोव्याचे जीवनमान मांडले आtन ती पुस्तके भावी पिढीला निश्चितच मार्गदर्शक म्हणून ऐतिहासिक ठरणार आहेत. राज्यपाल पिल्लई हे केवळ औपचारिकतेपुरते राज्यपाल न राहता जनतेत मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या निरीक्षणातून सरकार किंवा प्रशासनातील काही उणिवा समोर आल्यास त्या दूर करण्यास सरकार तयार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राज्यपाल पिल्लई यांच्या पुस्तकांच्या रॉयल्टीतून मिळालेल्या निधीचा ‘अन्नधन’ योजनेसाठी वापर करण्यात आला असून, काल रविवारी राजभवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात ‘अन्नधन’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून कर्करोग व डायलिसिस ऊग्णांना प्रत्येकी 25 हजार ऊपयांची मदत पुरवण्यात आली. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन व अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यपालांनी विविध मंदिरे, संस्था आणि जनतेच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न आणि प्रश्न जाणून घेतले आहेत. हे प्रश्न आणि त्यावर उपाय म्हणून त्यांनी पुस्तकाद्वारे गोव्याचे जीवन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेली रॉयल्टी त्यांनी अन्नदानासाठी वापरण्याचा निर्णय घेतला असून, हे कार्य प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
गोमंतकीयांना मदत करण्यात समाधान : राज्यपाल
राज्यपाल पिल्लई म्हणाले की, आपण लिहिलेल्या पुस्तकात गोव्यातील ऐतिहासिक मंदिरे, औषधी वनस्पती, झाडे यांचा समावेश आहे. गोव्याचा इतिहास, ऐतिहासिक मंदिरे, नैसर्गिक संपदा, झाडे यावर आधारित विविध भाषांत पुस्तके लिहिल्यानंतर या पुस्तकांना भरपूर प्रसिद्धी मिळत गेली. लोकांना आपण मांडलेले विषय आवडले आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या रॉयल्टीमधून मिळालेला निधी हा गोव्यातील गरजू लोकांना उपयोगी पडावा, यासाठी आपले प्रथम प्राधान्य असणे हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्या भावनेतूनच गोव्यातील गरजू लोकांना मदत करण्यात आली आहे.
गोव्याचे राजभवन हे आता लोकभवन : आर्लेकर
राजाने (राज्यपाल) जनतेत (लोकांमध्ये) मिसळून राहणे हे त्याचे कर्तव्य असते. तरीही यापुढे जात राज्यपाल पिल्लई यांनी गोव्यातील जनतेत थेट मिसळून त्यांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतल्या. लोकही राज्यपालांकडे विविध विषय घेऊन येतात. हा पायंडा म्हणजे राज्यपाल आणि जनता यामधील नाते वृद्धिंगत करण्यासारखा आहे. म्हणूनच राज्यपाल पिल्लई यांनी ‘राजभवन’ हे ‘लोकभवन’ असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रशंसोद्गार केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काढले.