भातपिकासाठी सरकारने नुकसानभरपाई द्यावी
शेतकरी संघटना आक्रमक : एकरी 40 हजार रुपये भरपाईची मागणी
बेळगाव : परतीच्या पावसाने भातासह इतर सर्वच पिकांना मोठा दणका दिला आहे. भातपीक पावसामुळे आडवे पडल्याने त्यावर पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एकरी 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. मागील आठवड्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसाने बेळगाव तालुक्यात भात पिकाचे सर्वाधिक नुकसान केले. भातपीक ऐन कापणीला आले असताना पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पिकांसाठी एकरी 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. परंतु राज्य सरकारकडून नुकसानभरपाईच्या नावाखाली केवळ 2 ते 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. यावर्षी आधीच करपा रोगाने शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता परतीच्या पावसानेही उरलेले पीकही खराब झाल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
पावसाच्या माऱ्यामुळे भातपीक टेकले जमिनीला
तालुक्याच्या पश्चिम तसेच दक्षिण भागात भात पीक ऐन भरात आले आहे. त्यामुळे पाऊस कमी झाल्याबरोबर भात कापणी सुरू करण्याची तयारी केली जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच परतीच्या पावसाने बेळगावसह परिसराला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाच्या माऱ्यामुळे भातपीक जमिनीला टेकले आहे. यामुळे पिकाचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईची मागणी सरकारकडे केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसू नका
परतीच्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने भात पिकासाठी नुकसानभरपाई देण्याची मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता एकरी 40 हजार रुपये भरपाई द्यावी.
-प्रकाश नाईक (शेतकरी नेते)