कोणीतीही आपत्ती हाताळण्यास सरकार सज्ज : मुख्यमंत्री
पणजी : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने भारतावरही हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला खरा, परंतु पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून गोव्यावर कोणतीही आपत्ती आली तर ती हाताळण्यास गोवा सक्षम आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, भारताचा संघर्ष हा कोणा जाती, धर्म वा देशाविरोधात नाही तर भारताचा लढा हा आतंकवाद्यांविरोधात आहे व त्यांना नेस्तनाबूत करणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. त्या अनुषंगानेच देशाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या वस्तीवर हल्ला चढविलेला आहे. भारताचा लढा हा दहशतवाद्यांच्या विरोधात आहे, कोणा एका धर्माच्या विरोधात लढा नाही. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गोव्यावर जर का परिणाम होत असेल तर परिस्थिती हाताळण्यास गोवा सरकार सक्षम आहे. आम्ही तयारीनिशी सज्ज आहोत, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. कोणत्याही संकटास तोंड देण्यास गोवा सज्ज असल्याची पुष्टी मुख्यमंत्र्यांनी पुढे जोडली.