‘हज’ला गेलेले गोमंतकीय यात्रेकरू सुखरूप : उर्फान
मडगाव : उष्णतेच्या लाटेमुळे जवळपास 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 60 हून अधिक भारतीयांचा समावेश आहे. मात्र, यात एकही गोमंतकीयाचा समावेश नाही. सर्व गोमंतकीय हज यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी दिली आहे. गोमंतकीय हज यात्रेकरूच्या संपर्कात आपण असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक हे देखील हज यात्रेकरूच्या संपर्कात आहेत. एकूण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या सर्वांचा आम्हाला सतत पाठिंबा मिळत असल्याची माहिती उर्फान मुल्ला यांनी दिली.
हज यात्रा सुरू होण्यापूर्वी भारतातून गेलेल्या 29 जणांना व नंतर यात्रा सुरू झाल्यानंतर 29 जणांचा बळी गेला, त्यातील बहुतेक जण हे वयस्क होते असे उर्फान मुल्ला म्हणाले. मात्र, यात एकाही गोमंतकीयांचा समावेश नाही. सर्व गोमंतकीय सुखरूप आहेत व त्यांची हज यात्रा पूर्ण झालेली आहे. हे सर्वजण 19 जुलै रोजी पुन्हा गोव्यात येतील, अशी माहिती मुल्ला यांनी दिली. हज समितीचे केंद्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात असून अमित शहा आज किंवा उद्या सौदी अरेबिया सरकारकडे बोलणी करून तोडगा काढतीत, असे उर्फान मुल्ला म्हणाले.
मुस्लिम धर्मगुरू राजकारणावर भाष्य करत नाहीत
गोव्यातील अल्पसंख्याक धर्मगुरूनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात उर्फान मुल्ला यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता ते म्हणाले की, मुस्लिम धर्मगुरू राजकारणावर भाष्य करत नाहीत, असे ते म्हणाले.