परमेश्वराची देणगी
एकेकाळी ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गाणे आकाशवाणीवर, समारंभात किंवा कुणी कुठेही म्हटले की आजूबाजूच्या बायका डोळ्यांना पदर लावत असत. त्यांच्या आयुष्यातल्या लग्नातल्या वरातीच्या प्रसंगाचा त्यांना आठव होऊन डोळे पाझरायला लागत. काही गाणी अंत:करणाचा ठाव घेतात. हृदय कितीही कठोर असले तरी गाणे ऐकून विरघळते आणि डोळ्यातल्या अश्रूंमध्ये त्याची साक्ष उमटते. मानवी जीवनाचे सत्य ज्यात ठळकपणे उमटते त्या गदिमाविरचित गीतरामायणातले ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गाणे ऐकले की हृदयात कालवाकालव होते. डोळे पाझरू लागतात. जगण्यामरण्याचे वास्तव सांगताना गदिमा म्हणतात, ‘जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात? दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात? । वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा, दोष ना कुणाचा....’ या गाण्याचे सूर लौकिकाचा घट्ट धरून ठेवलेला धागा हातातून सोडवायला भाग पाडतात. एकटा आलो, एकटाच जाणार हे सत्य जिवाला उमगते आणि डोळ्यांत आसवांची गर्दी होते. ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी?’ हे गाणे आईचे सुख अनुभवणारे व त्यापासून वंचित असणारे दोघांनाही रडवते. श्यामची आई हे पुस्तक वाचताना रडू आले नाही तो माणूस विरळाच. हास्य जशी परमेश्वराची देणगी आहे तसेच रडू येणे ही सुद्धा एक उन्नतीकडे जाणारी वाट आहे. कारण अश्रूंची ओळख असेल तरच दुसऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू पुसता येतात.
आईच्या उदरात सेहं म्हणत आनंद अनुभवणारा जीव जगात प्रवेश करतो तो केहं म्हणत रडतच. ओशो रजनीश म्हणतात, आईच्या पोटात जन्म घेताना मूल नाळेद्वारे आईशी जोडलेले असते. आईची जीवनधारा त्या बाळामध्ये प्रवाहित होत असते. ही जीवनधारा एक अज्ञात अशी विद्युतधारा आहे. बाळाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे ती पोषण करत असते. जन्मानंतर ही जीवनधारा तुटूनच जाते आणि बाळ रडू लागते. हसण्या-रडण्याचा खेळ ऊनपावसासारखा जीवनभर सुरू असतो. वृद्धावस्थेत एवढ्यातेवढ्या कारणांनी माणसे रडतात. ते अश्रू विरहाचे, उद्वेगाचे, पश्चातापाचे, कृतज्ञतेचे आणि सुंदर आयुष्य गमावल्याचेही असू शकतात. रमेश गोविंद वैद्य यांची एक रूबाई आहे-
‘नावा रित्याच येती आणि रित्याच जाती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती..’
जन्म आला आणि गेला तो समजला नाही म्हणून रडणाऱ्याला जर आत्मशोधाची वाट गवसली तर तो भाग्यवानच.
महाभारतातला युद्धप्रसंग आहे. आपल्यासमोर आपले वडीलधारी उभे आहेत आणि त्यांना मारण्यासाठी आपण उभे आहोत हे फार मोठे पाप आहे, असे अर्जुनाच्या मनात आले. त्यांचा वध करून राज्य मिळवणे म्हणजे नरकाच्या वाटेवर जाणे आहे असे वाटून अर्जुनाला उद्वेग आणि न आवरता येईल एवढा गहिवर आला. दु:खी होऊन त्याने रथ सोडला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘मग धनुष्यबाण सांडले । न धरत अश्रूपात आले । ऐसे ऐक राया वर्तले । संजयो म्हणे?’ धनुष्यबाण खाली टाकून अर्जुन रडू लागला. यानंतर भगवद्गीतेचा जन्म झाला. माऊली म्हणतात, या प्रसंगानंतर श्रीकृष्णाने कौतुकाने परमार्थ सांगणारी जी कथा सांगितली आहे ती म्हणजे गीता आहे. पापाचे भय आणि विनाकारण करुणेचे अश्रू अर्जुनाच्या डोळ्यांत भगवंताला नको होते.
संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ‘मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया । तैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय । वेठी धरील्या दावी भाव । मागे पळायाचा पाव । काजव्याच्या ज्योती। तुका म्हणे न लगे वाती?’ मजुरी अर्थात पैसे देऊन रडायला लावले तर डोळ्यांत अश्रू कुठून येणार? तो दिखाऊ आक्रोश असतो. मनात प्रेम असताना जे अश्रू येतात तेच खरे असतात. त्याप्रमाणे प्रेमावाचून केलेली भक्ती भगवंतप्राप्तीला कारण होत नाही. भगवंताचे नुसते स्मरण जरी झाले तरी भक्ताचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. परमार्थ पथावरील अष्टसात्विक भाव असे आहेत. 1) रोमांच, 2) श्वेत, 3) अश्रू, 4) कंप, 5) स्तंभ, (शारीरिक व मानसिक मिश्र) 6) मानसिक ताटस्थ्य, 7) शांती, 8) मनस्वी आनंद. भगवंतालाही भक्ताबद्दल अतीव प्रेम असते तेव्हा तो सत्वर धावून जातो.
संत नामदेव महाराजांनी संत चोखामेळा यांचे चरित्र लिहिले आहे ते फार सुंदर आहे. चोखोबांच्या पत्नी सोयराबाईंचे बाळंतपण जवळ आले तसे त्यांनी पतीला घरात तयारी करायला सांगितली तेव्हा चोखोबा बहिणीकडे निघून गेले. पत्नी वाट पाहून अस्वस्थ झाली. पांडुरंगाला म्हणाली, पतीला लवकर आणा. त्याला संसारात गुंतवून ठेवणार नाही. जेव्हा प्रसूतीची वेळ जवळ आली तेव्हा काय झाले? तर विठाई धावली. संत नामदेव महाराज म्हणतात, ‘चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा द्वार हाका मारी.’ पांडुरंग घरी आला तो रिद्धीसिद्धीसह. मग काय विचारता? बाळंतपण व्यवस्थित झाले. साखर वाटली. पाचवीची पूजा केली. बारसे केले. नाव ठेवले कर्ममेळा. सर्वांना भोजन घातले. साडीचोळी, अंगडे टोपडे आहेर केला. इकडे चोखामेळाला वाटले की संसाराच्या भयाने पांडुरंगाचे पाय सोडून आलो... पांडुरंगाची आठवण येताच ‘सद् गदित झाले तयाचे अंतर। प्रेम अश्रू नीर वाहे डोळा?’ चोखोबा घरी आले आणि बहिणीच्या रूपातला पांडुरंग गुप्त झाला. सोयराबाईंनी सगळा वृत्तांत सांगताच चोखोबा म्हणाले, ‘कैची बाई येथे आले पांडुरंग ।धन्य तुझे भाग्य भेटी झाली?’ दोघांच्याही डोळ्यांतून प्रेमाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. देवासाठी आलेले अश्रू अनमोल असतात.
माहूरगडची श्री रेणुका माता मातृस्नेहाचे प्रतीक आहे. आपला पुत्र परशुरामाला श्री दत्तप्रभूंच्या स्वाधीन करून त्याच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवून त्याचा प्रतिपाळ करा अशी विनंती रेणुका मातेने केली आणि सहगमन केले. श्री दत्तप्रभू म्हणाले, परशुरामा तुझी आई धन्य आहे. तेव्हा परशुरामाचा धीर सुटला. आई दिसेनाशी झाल्यावर तिचे प्रेम व श्रेष्ठ गुण आठवून परशुराम हंबरून रडू लागले तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, तुझी आई साक्षात जगन्माता आणि पिता जमदग्नी हे परम शिव आहेत. ते सर्वव्यापी असून विद्यमान आहेत. ते कुठेही जात नाहीत. कुठूनही येत नाहीत. आत्ताही ते इथेच आहेत. परशुरामांना ह्याचे आकलन झाले असले तरी आईच्या मायेचा बंध त्यांना तोडता येईना. आईसाठी त्यांचे मन आक्रंदन करू लागले तेव्हा मोठा आवाज होऊन भूमी दुभंगली आणि रेणुका मातेचे मुख प्रकटले. मातृमुखाने प्रेमाने परशुरामांना जवळ घेतले. आईच्या अगाध पुत्रप्रेमाचा हा आविष्कार आहे, असे श्री दत्तमहात्म्य या ग्रंथामध्ये प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात. कंसाला मारून गोपाळकृष्णांनी त्याचा उद्धार केला तेव्हा सारे गोकुळवासी जमले होते.
आता पुन्हा श्रीकृष्ण गोकुळात येणार नाही हे जाणून नंदबाबा आणि यशोदा माता यांच्या डोळ्यांतून अखंड पाणी वाहत होते. इतके की डोळ्यांमधल्या पाण्याचा ओहोळ झाला आणि ते पाणी भगवंताच्या पायाला लागले. तेव्हा भगवंत धावत आई-बाबांकडे गेले आणि त्यांना घट्ट अलिंगन दिले. त्यामुळे त्या दोघांच्या हृदयात ठसले की हा परमात्मा आहे. हा कुठेही गेला तरी सर्वत्र हृदयात भरून राहणारा आहे. या हृदयीचे त्या हृदयी घातले
प्रेमाने येणारे डोळ्यांतले अश्रू ही परमेश्वराची देणगी आहे. ती प्रेमामुळेच प्राप्त होते.
-स्नेहा शिनखेडे