For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याचा थक्क करणारा विकास भाजपमुळेच!

06:55 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्याचा थक्क करणारा विकास भाजपमुळेच
Advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन ; भाजप मुख्यालयाच्या अत्याधुनिक प्रकल्पाची पायाभरणी

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

आधुनिक गोव्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने मनोहर पर्रीकर यांनी रोवली व आज गोव्याचे जे बदललेले स्वरूप आपण पाहतो त्याचे श्रेय केवळ आणि केवळ भाजपलाच जाते. गोव्याला साधनसुविधा मिळाल्या, त्यातून आधुनिकता आली, असा हा गोव्याचा थक्क करणारा विकास भाजपमुळेच झाला आहे. त्यात गोव्याच्या जनतेचेही तेवढेच योगदान आहे. त्यांनी भाजपला भरभरून आशीर्वाद दिले म्हणूनच हे शक्य होत आहे व भविष्यातही लोकांची साथ मिळवत विकासाची चौफेर घोडदौड करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Advertisement

भाजपच्या गोवा प्रदेश नूतन कार्यालयाचे जुने गोवे कदंब पठारावर भूमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. ताळगाव येथे समाज सभागृहात आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे, आलेक्स सिक्वेरा, सुभाष शिरोडकर, दिगंबर कामत, नीलेश काब्राल, दिव्या राणे, डिलायला लोबो, प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, गोविंद पर्वतकर, केदार नाईक, उल्हास तुयेकर, गणेश शेटकर, दाजी साळकर, विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, समीर मांद्रेकर, दयानंद सोपटे आदी मान्यवर उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये सभापती रमेश तवडकर यांचाही समावेश होता.

पक्ष हा आईसारखा असतो

पुढे बोलताना फडणवीस यांनी, पक्ष हा आईसारखा असतो. त्यामुळे त्याचे कार्यालय होणे यात आईची सेवा केल्याचे समाधान मिळते. अशावेळी कार्यालय किती सुंदर आहे यापेक्षा तेथे किती प्रभावी कारभार चालतो हे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. शिवाजी महाराज जेथे जायचे तेथे तटबंदी किल्ला बांधायचे. गोव्याचे कार्यालय त्या किल्ल्यासारखेच ठरले पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते आपलेसे वाटले पाहिजे. त्यातच त्याचे महत्त्व सामावलेले असेल, असे ते म्हणाले.

गोव्याचे सौंदर्य, लौकिकाला साजेसेच असेल कार्यालय

गोव्यात होणारा प्रकल्प हा गोव्याचे सौंदर्य आणि लौकिकाला साजेसाच असेल असा विश्वास व्यक्त करताना आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण केवळ साक्षीदारच नव्हे तर भागिदारही आहोत याचा आनंद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल आणि पुढील 100 वर्षे हे कार्यालय जनसेवेसाठी कार्यरत राहील. देशभरात एकूण 768 कार्यालये बांधण्याचा संकल्प असून पैकी 563 कार्यालये बांधून पूर्णही झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

विघातक शक्तीना दूर ठेवण्यासाठी भाजप सत्तास्थानी हवा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधक म्हणून जरी काँग्रेस आघाडीवर होता तरी प्रत्यक्ष निवडणूक मात्र वेगवेगळ्या विघातक शक्ती लढवत होत्या. या शक्ती अराजक माजविण्याचे प्रयत्न करत होत्या. लोकांमध्ये नकारात्मकता पसरविण्याचे प्रयत्न करत होत्या. देशाला खिळखिळे करण्याचे, येथील लोकशाही, लोकतंत्र संपविण्याचे प्रयत्न करत होत्या. त्यांचे ते प्रयत्न आजही जारी आहे. पुन्हा सत्ता मिळाल्यास काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करण्यासाठी त्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांचा जाहीरनामा तेच सांगतो आहे. यावरून भविष्य किती भयानक आहे त्याची झलक दिसून येते. म्हणूनच अशा विघातक शक्तीना दूर ठेवण्यासाठी भाजप सत्तास्थानी राहणे आवश्यक आहे. या शक्तीविरोधात भाजप लढणार आहे. लोकशाही लोकतंत्र मजबूत करण्यासाठी लढणार आहे, त्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे. या शक्तींचा मुकाबला केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

केवळ 10 वर्षांत गोव्याचा कायापालट : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलताना, भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने गोव्याचा विकास झाला, असा दावा केला. काँग्रेस काळात नाव घेण्यासारखा एक जरी प्रकल्प आलेला असेल तर त्यांनी सांगावा, असे आव्हान त्यांनी दिले. 2014 पासून साधनसुविधांचा पाया अधिकाधिक मजबूत झाला व आज केवळ 10 वर्षांच्या काळातच मोपा विमानतळ, अटल सेतू, झुवारी पूल, काणकोणमध्ये मनोहर पर्रीकर महामार्ग, यासारख्या प्रमुख प्रकल्पांसह अन्य कितीतरी प्रकल्प उभे राहिले आहेत, असे ते म्हणाले.

विरोधकांना तोंड देण्यास आम्ही सक्षम

हे सर्व काही कार्यकर्त्यांच्या नित्य पाठबळामुळेच शक्य झाले व याच कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर 2027 ची निवडणूकही आम्ही बहुमताने जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही टीका, आरोप केले तरी न डगमगता त्यांचा सामना करण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी स्वागतपर भाषणात अत्याधुनिक सुविधांनी युक्त कार्यालयासंबंधी विस्तारित माहिती दिली. सिद्धार्थ कुंकळकर यांनी सूत्रसंचालन केले. पायाभरणी समारंभास उपस्थित न राहू शकलेले राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. विकसित गोवा आणि भाजपाकरता हे कार्यालय वेगळे आत्मबळ देईल, असे न•ा यांनी संदेशात नमूद केले.  श्री. फडणवीस यांनी भाषणात सर्वप्रथम कार्यक्रम सुरू होण्यास बराच विलंब झाल्याबद्दल सर्वांप्रति दिलगिरी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.