म्हादई पाणी वाटप निवाड्याला गोवा आज नोंदवणार आक्षेप
पणजी : म्हादईच्या संपूर्ण पात्रात 188.06 टीएमसी पाणी असल्याचा जो दावा म्हादई जलतंटा लवादाने या तंट्यावर 14 ऑगस्ट 2018 रोजी निवाडा देताना नमूद केले होते. नेमक्या याच मुद्यावर गोवा सरकारने आक्षेप घेतला असून आज बुधवार 6 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी हा आक्षेप नोंदवला जाईल, अशी माहिती अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. म्हादई तंट्याशी निगडीत गोवा सरकारची विशेष याचिका आणि संबंधित अन्य चार याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. म्हादई लवादाच्या निर्णयाला गोवा सरकारने आव्हान दिले आहे. लवादाने म्हादई नदीपात्रात पाण्याचे जे प्रमाण सांगितले आहे, ते योग्य नाही. याशिवाय राज्य सरकारच्या आणखी काही मागण्या असल्याचे पांगम यांनी सांगितले. गोव्याच्या मुख्य वनसंरक्षकांनी कर्नाटकला नोटीस बजावून म्हादई नदीवर सुऊ केलेले बांधकाम थांबवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हाही एक मुद्दा आजच्या सुनावणीदरम्यान येणार आहे. लवादाच्या म्हणण्याप्रमाणे म्हादईच्या संपूर्ण पात्रात 188.06 टीएमसी पाणी असते. नदीचे पात्र 2031 चौरस किलोमीटर इतके आहे. कर्नाटकाला 3.9 टीएमसी पाणी नदीपात्राच्या बाहेर वळविण्यासाठी तसेच 1.50 टीएमसी पाणी वापरासाठी आणि 8.02 टीएमसी पाणी अन्य वापरासाठी म्हादई हायड्रोपावर प्रकल्पासाठी दिले. महाराष्ट्राला 1.33 टीएमसी पाणी दिले पण तिळारी नदीत पाणी वळविण्यासाठी नकार दिला. गोव्याला 24 टीएमसी पाणी दिले जे 59 नव्या प्रकल्पांसाठी आहे, त्यात सध्या वापरात असलेल्या 9.395 टीएमसी पाण्याचा समावेश आहे.