चीनच्या आक्रमकपणावर जर्मनीची टीका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिवसेंदिवस चीन अधिकाधिक आक्रमक आणि दुराग्रही बनत चालला असून आता त्याने नियमांवर आधारित जागतिक व्यवस्थेलाही आव्हान देण्यास प्रारंभ केला आहे, अशी कठोर टीका जर्मनीचे उपमंत्री टोबियास लिंडनर यांनी केली आहे. भारताच्या सीमेवरही चीन आपल्या अशा मनोवृत्तीचे दर्शन घडवित असून दक्षिण चीन समुद्र आणि तैवानचा भाग यांच्यात त्याचा उपद्रव वाढीला लागला आहे, अशीही टीका त्यांनी केली. चीनच्या या वृत्तीमुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या अन्य स्थायी सदस्य देशांचे उत्तरदायित्व अधिकच वाढले आहे. चीनला रोखण्याचे कार्य त्यांना करायचे आहे, अशीही टिप्पणी त्यांनी केली.
चीनच्या आक्रमकपणामुळे काही देशांसमोर त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि सीमांचे संरक्षण करण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. विश्व समुदायाने एकत्रिपणे अशा प्रवृत्तीना विरोध करण्याची आवश्यकता असून जर्मनी त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. चीननेही स्वत:ला आवर घालण्याची आवश्यकता आहे. सध्या तांबड्या समुद्रातही हुती चाच्यांनी हैदोस घातला आहे. याचा जागतिक व्यापारावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भात भारत आणि जर्मनी यांची ध्येये आणि विचारसरणी समान आहे. आम्ही एकत्रितरित्या अशा संकटांशी दोन हात करण्यास सज्ज आहोत, अशा अर्थाची विधानेही लिंडनर यांनी केली. युव्रेनसंबंधी रशियानेही आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे यांचे सरसटक उल्लंघन केले आहे, अशी टीका त्यांनी केली. ते दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले असून भारताशी आर्थिक आणि इतर क्षेत्रांमध्ये दृढ संबंध प्रस्थापित करण्यात आम्हाला स्वारस्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. रशियासंबंधात भारताची भूमिका काहीशी वेगळी असली तरी आमचे संबंध अधिकाधिक दृढ होत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.