बारावीला गवसणी; मात्र पदवी प्रवेशात अडचणी
पदवी महाविद्यालयांमध्ये जागांची कमतरता, प्रवेशासाठी स्पर्धा तीव्र
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यावर्षी बारावीत 16,871 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निकालात वाढ झाली असली तरी पदवी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. कारण महाविद्यालयांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेसाठी अतिरिक्त जागा मंजूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बुधवार दि. 10 रोजी राज्याचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी सीसीटीव्हीची नजर असल्याने काटेकोर पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. फ्रेशर्स आणि रिपिटर्स असे मिळून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 23,045 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 16,871 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कला शाखेतील 8,763, वाणिज्य विभागात 6,886 तर विज्ञान विभागात 7,396 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रामीण भागातील 6,175 तर शहरी भागातील 16,870 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, त्या मानाने महाविद्यालयांची पदवी प्रवेश क्षमता नसल्याने अडचणी येण्याच्या शक्यता आहेत. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आतापासूनच पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी तयारीला लागले आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल, पॅरामेडिकल या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी सीईटी, नीटच्या तयारीला लागले आहेत. तर उर्वरित विद्यार्थी पदवी कॉलेजमध्ये जाऊन प्रवेशासाठी चौकशी करीत आहेत.
राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या मोजकीच आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील उच्च शिक्षणासाठी शहरी भागातच प्रवेश घेत असल्याने शहरी भागातील महाविद्यालयांवर भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.