शहरात पुन्हा साचू लागले कचऱ्याचे ढीग
मनपा लक्ष देणार का? व्यावसायिकांतून नाराजी
बेळगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच पडून राहत आहेत. त्याची उचल वेळेत होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा बाजारपेठेत कचऱ्याची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गणपत गल्लीनंतर मेणसे गल्ली परिसरातही कचऱ्याचा ढीग साचून आहे. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरामध्ये घरोघरी जावून कचरा गोळा केला जातो. मात्र बाजारपेठेमध्ये कचरा गोळा करणे अशक्य असते. त्यामुळे व्यावसायिक एखाद्या चौकामध्ये अथवा रस्त्याच्या बाजुला कचरा फेकून देतात. एखाद्या व्यावसायिकाने त्या ठिकाणी कचरा टाकला तर इतर व्यावसायिकही त्याच ठिकाणी कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे कचरा साचून राहत आहे. तेव्हा तातडीने त्या कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी होत आहे. तत्कालीन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पहाटे व रात्रीही कचरा गोळा करण्यासाठी आदेश दिला होता. त्यामुळे शहरात दोनवेळा कचरा गोळा केला जात होता. परिणामी कचऱ्याचे ढीग कमी दिसत होते. जवळपास ब्लॅकस्पॉट निर्मूलन झाले होते. मात्र आता कचरा एकाचवेळी गोळा करण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीrही व्यावसायिक रस्त्यावरच कचरा फेकून देत आहेत. कचऱ्याचे ढीग साचून राहत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. तेव्हा मनपाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.