मंत्रिमंडळात वारंवार बदल चिंताजनक : भगत
मडगाव : अलीकडच्या काळात गोव्यात मंत्रिमंडळात अनेक बदल झाले आहेत, ज्यामुळे नागरिक आणि विविध घटकांमध्ये चिंता वाढली आहे. मंत्रिमंडळातील बदल हे अनेकदा राजकीय हेतूने होतात. पण ते प्रभावी प्रशासनासाठी अडथळा ठरतात. तसेच त्यामुळे वेळ वाया जातो आणि नैतिक मानकांची घसरण होते, असे आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते सिद्धेश भगत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. या वारंवार होणाऱ्या बदलांमुळे केवळ प्रशासनातील सातत्यच बाधित होत नाही, तर राष्ट्रीय स्तरावर राज्याच्या प्रतिमेवरही सावट पडते. स्थिरता आणि धोरणात्मक कारभार यापेक्षा राजकीय डावपेचांना प्राधान्य दिले जाते तेव्हा गोव्याच्या प्रतिमेवर विपरित परिणाम होतो. यामुळे अनेकांनी अशा बदलांमागील हेतूंबद्दल प्रश्न उपस्थित केले असून विशेषत: भाजपमध्ये खेळल्या जाणाऱ्या राजकीय खेळांवर त्यातून प्रकाश पडला आहे, असे भगत यांनी म्हटले आहे. नागरिक म्हणून आपण स्थिर आणि नैतिकता बाळगणाऱ्या तसेच राज्याच्या हितासाठी कार्य करणाऱ्या प्रशासनाला प्राधान्य दिले पाहिजे. वारंवार येणारे असे व्यत्यय प्रगतीत अडथळा आणतात आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतवर परिणाम करतात. म्हणून राजकीय नेत्यांनी या चिंतांचे निराकरण करणे आणि स्थिरता, नैतिकतेचे पालन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गोवा आणि येथील लोकांच्या भल्यासाठी प्रभावी प्रशासनाला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे यावर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे आहे, असे भगत यांनी म्हटले आहे.