मालदीवचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर दाखल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. गुऊवारी त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. चीन समर्थक मुइझ्झू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मालदीवच्या कोणत्याही मंत्र्याने भारत दौऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अलिकडेच मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले होते.
दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय बैठकीदरम्यान जयशंकर यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ‘भारत नेहमीच नेबर फर्स्ट धोरणाचे पालन करतो. दोन्ही देशांमधील संबंध परस्पर हितसंबंधांवर आधारित आहेत. विकासाच्या दृष्टीने मालदीवला पाठिंबा देणाऱ्या महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आमच्या अनेक प्रकल्पांचा मालदीवच्या लोकांना फायदा झाला आहे. भारताने अनेकवेळा मालदीवला आर्थिक मदतही केली असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.