महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसंग्रह

06:30 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंत उद्धवाला म्हणाले, तू बद्रिकाश्रमात जावे ही माझी आज्ञा समज. बद्रिकाश्रामाचे महत्त्व अपरंपार आहे. जो नर त्याचे दर्शन घेऊन त्याला श्रद्धेने नमन करतो त्याचा नारायण होतो. भगवंतांनी एव्हढे निक्षून सांगितल्यावर मात्र त्यावर काही न बोलता उद्धव गप्प बसला कारण भगवंतांची आज्ञा त्याला शिरोधार्य होती. उद्धवा तुझ्या ठायीं पूर्ण ज्ञान आहेच त्यात तू माझे भजनही करतो आहेस. त्यामुळे तुझ्या चरणस्पर्शाने बद्रिकाश्रम पावन होईल. भगवंतांचे निरोपाचे बोलणे ऐकून त्यांच्या विरहाच्या कल्पनेने उद्धवाला रडू आले पण आता त्याचा नाईलाज झाला होता. म्हणून तो धावत गेला आणि त्याने भगवंतांचे पाय पकडले आणि म्हणाला, देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बद्रिकाश्रमाकडे जात आहे. उद्धवाचे बोलणे ऐकून देवांना परमसंतोष झाला. ते म्हणाले, अतीव दु:खदायक असा ब्रह्मशाप चुकवण्यासाठी मी तुला तीर्थाटनाला पाठवत आहे अन्यथा तू ब्रह्मज्ञानी असल्याने तुला तीर्थाटनाची गरज नव्हती. तुझे भवबंधन लहानपणीच नाहीसे झाले आहे हे मला माहित असूनही ब्राह्मपाशाने तुझा विनाश होऊ नये म्हणून तू तीर्थाटनाला आवश्य जा. तू तेथे गेल्यावर तुझ्या हातून मोठ्या प्रमाणावर लोकांच्यावर उपकार होईल. त्यामुळे सर्व दीन जनांचा उद्धार होईल. भगवंत उद्धवाला तू बद्रिकाश्रमाला जा एव्हढे सांगून थांबले नाहीत तर तेथे गेल्यावर त्याने काय करावे, तेथे कसे रहावे हेही सर्व सविस्तर सांगू लागले. भगवंतांनी उद्धवाला हे समजावून सांगण्याचे प्रमुख कारण म्हणजे उद्धव तेथे गेल्यावर ज्याप्रमाणे वागेल त्याप्रमाणे इतर लोक त्याचे अनुकरण करतील त्यामुळे तेही धन्य होतील. भगवंतांची अशी इच्छा होती की, उद्धवाचे तेथील वागणेबोलणे आदर्शवत असावे. त्याच्या तेथील आदर्शवत वागण्याबोलण्यातूनच तेथील लोकांना उपदेश मिळावा. त्यादृष्टीने ते उद्धवाला म्हणाले, वैराग्य-भक्ती-ज्ञान आणि स्वधर्माचरण सोडू नको. ह्यातून भगवंताना हे सांगायचे आहे की, उद्धवा जे काही आहे त्यात समाधानाने राहा. ईश्वराची अनन्य भक्ती कर आणि स्वत:च्या वाट्याला आलेले काम निरपेक्षतेने कर म्हणजे तुझ्या हातून स्वधर्माचरण घडेल. अर्थातच भगवंतांनी उद्धवाला केलेला हा उपदेश सर्वच भक्तांना सारखाच मार्गदर्शक आहे. ह्याप्रमाणे वागत गेल्यास उद्धार होणे निश्चित आहे. उद्धवाला भगवंतांनी नुसताच उपदेश केला असे नाही तर आधी त्यांनी जीवनात त्याप्रमाणे वागून दाखवले होते. ते म्हणाले, उद्धवा त्रिभुवनात माझ्यासाठी काही कर्तव्य असे नसते.तरीही त्यापलीकडे जाऊन लोकसंग्रह करावा ह्या उद्देशाने माझ्या सर्व हालचाली, वागणे सुरु असते. अवतारात हाच माझा स्वधर्म असतो. आता एक लक्षात घे की, लोकसंग्रह म्हणजे नुसती लोकांची गर्दी जमवणे नव्हे तर लोकांना एकत्र करून त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे होय. ह्यावर तू कदाचित असे म्हणशील की, तुमच्या शिरावर सगळ्या त्रैलोक्याचे ओझे असल्याने तुम्ही स्वधर्माचे पालन केलेत. तुझे हे म्हणणे बरोबर आहे परंतु मी आता निजधामाला जाणार असल्याने माझी जबाबदारी आता तुला निभवायची आहे, यासाठी माझी परिपूर्ण अवस्था मी तुला अर्पण केली आहे. तेव्हा अवतारकाळात आत्तापर्यंत मी जसे कार्य करत होतो त्याप्रमाणे कार्य करणे ही आता तुझी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने लोकसंग्रह करण्यासाठी तू आता सर्व मोहमाया सोडून विरक्त हो. त्यासाठी मी तुला ह्याआधी सविस्तर वर्णन करून सांगितलेली अभेदभक्ती कर. अभेदभक्तीमध्ये कोणताही भेदभाव न करता समबुद्धीने ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षपणे करण्याचा समावेश होतो. तेव्हा अभेदभक्ती, वैराग्य, ज्ञान ह्याचे स्वत: आचरण कर म्हणजे त्याचे महत्त्व जाणून लोक त्याप्रमाणे वागतील अशा लोकांना एकत्र करणे ह्याला लोकसंग्रह असे म्हणतात.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article