आसाममध्ये पुरामुळे 9 गेंड्यांचा मृत्यू
काझीरंगा उद्यानात 150 प्राण्यांनी गमाविला जीव
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये पुरामुळे मनुष्य तसेच प्राण्यांनाही जीवाला मुकावे लागले आहे. पुरामुळे अनेक प्राण्यांचाही मृत्यू ओढवला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 150 हून अधिक प्राणी पुराच्या पाण्यात बुडाले असू यात 9 दुर्लभ एक शिंगी गेंडेही सामील असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आसाम मागील दोन महिन्यांपासून पूरसंकटाला सामोरा जात आहे. पुरात कमीतकमी 79 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा एक तृतीयांश हिस्सा पाण्यात बुडाला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एक शिंगी गेंड्यांची एकूण संख्या 4 हजार इतकी आहे.
अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने बुधवारी ईशान्येतील राज्यांमध्ये आणखी 2-3 दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे. आसाम सरकारनुसार राज्यातील 9 नद्या अद्याप धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांची पातळी देखील वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.