आसाममध्ये पूरपरिस्थिती आणखी गंभीर
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममध्ये पूरपरिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. 24 लाख 50 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले असून त्यांना सुरक्षित स्थानी आश्रय देण्यात आला आहे. आतापर्यंत पुरामुळे 52 जणांचे बळी गेले आहेत. तसेच अतीपावसाने दरडी कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती.
पुरामुळे दिब्रुगढ जिल्ह्यात विशेष हानी झाली आहे. या भागाचा दौरा मुख्यमंत्री सर्मा यांनी शुक्रवारी केला होता. अनेक स्थानी पुरात नागरीक अडकलेले आहेत. त्यांना अन्नपाणी आणि औषधे पुरविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले असून साहाय्यता कार्य वेगाने केले जात आहे, अशी माहिती सर्मा यांनी दिली.
अनेक जिल्ह्यांना फटका
काचार, कामरुप, हैलाकांडी, होजाई, धुबरी, नागांव, मोरीगांव, गोलपारा, बारपेटा, दिब्रुगढ, नळबारी, धामाजी, बोंगाईगांव, लखीमपूर, जोरहाट, सोनीपूर, कोक्राझार, दक्षिण सलमारा, दारांग आणि तिनसुकीया या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने 612 आश्रयछावण्या स्थापन केल्या असून सध्या या छावण्यांमध्ये विस्थापितांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना अन्न आणि औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.