खानापुरात पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन
खानापूर : शहर परिसर तसेच ग्रामीण भागातील पाच दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने रविवारी सायंकाळी निरोप देण्यात आला. तसेच शासकीय कार्यालयातील गणपतींचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा घोषणा देत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच संगीताच्या आणि ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. सायंकाळी 5 नंतर मलप्रभा नदीघाटावर गणेशभक्तांची एकच गर्दी झाली होती. विशेषत: रविवारी सायंकाळी खानापूर शहरासह ग्रामीण भागातील विसर्जन ठिकाणी नदी, तलाव, विहीर परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत घरगुती गणेशमूर्तींचे तसेच शासकीय मूर्तींचे विसर्जन सुरूच होते.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी सायंकाळच्या वेळेस खानापूर मलप्रभा काठावर गणेशभक्तांची गर्दी झाली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशमूर्तेंचे विसर्जन करण्यात आले. यापूर्वी दीड दिवसाच्या गणरायांना गुरुवारी निरोप देण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी पाचव्या दिवशी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात केले गेले. शासकीय कार्यालयातील गणरायांचेही सायंकाळी विसर्जन केले. यासाठी गणराया आऊढ झालेल्या वाहनावर विद्युतरोषणाई केली होती. सायंकाळी जि. पं. उपविभाग, तहसीलदार कार्यालय, हेस्कॉम, पोलीस स्टेशन तसेच परिवहन खात्याच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी शासकीय गणपतींचे विसर्जनही मलप्रभा नदीघाटाजवळील नवीन पूलवजा बंधाऱ्यावरच केले. सायंकाळी गणेशमूर्तीची विधिवत पूजा व आरती झाल्यानंतर कुटुंबीयांसह आबालवृद्धानी भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. मंगळवारीही मुळा नक्षत्रावर गणरायांचे विसर्जन होणार आहे.