अखेर ओलमणी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
नागरिकांमधून समाधान : तरुण भारत वृत्ताची दखल
वार्ताहर /जांबोटी
ओलमणी ता. खानापूर येथे उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाईची दखल घेऊन, जांबोटी ग्राम पंचायतीने शनिवारपासून गावात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ओलमणी येथील सार्वजनिक नळपाणीपुरवठा गेल्या महिन्याभरापासून विस्कळीत झाल्याने गावात तीव्र पाणीटंचाई उद्भवल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत होते. ओलमणी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीतून जलवाहिन्याद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र या परिसरात गेल्या महिन्याभरापासून होणारा अनियमित वीजपुरवठा तसेच या भागात झालेल्या मुसळधार वळीव पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ झाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावात पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल दूर करण्यासाठी गावात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी जांबोटी ग्रामपंचायतकडे केली होती. सदर मागणीची दखल घेऊन ग्राम पंचायतच्या वतीने अखेर शनिवारपासून ओलमणी गावामध्ये दोन टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रा. पं. ने घेतली वृत्ताची दखल
ओलमणी गावात उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाई संदर्भात ‘तरुण भारत’च्या शनिवार दि. 1 जूनच्या अंकात गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर वृत्ताची जाबोटी ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे ‘तरुण भारत’चे देखील नागरिकांमधून कौतुक होत आहे.