ढगेवाडीतील मूर्तीकारांचा गणेशमूर्तीवर शेवटचा हात
ऐतवडे / प्रकाश सादळे :
बुद्रुक प्रतिवर्षी ऑगस्ट महिना म्हंटले की, स्वातंत्र्य दिन हा झेंडावंदन व शासकीय उत्सव दिन म्हणून साजरा होतो. पण याचबरोबर ऑगस्ट महिन्यात वेध लागतात ते श्री गणेश उत्सवाचे. लहान मुलांच्यासह छोट्या-मोठ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना श्री गणेशाच्या आगमनाची उत्सुकता असते. गणरायाचे आगमन काही दिवसावर आले असून गावागावात श्रींच्या स्वागताचे डिजिटल झळकू लागले आहेत. तर मूर्तिकारांची गणेश मूर्तीवर श्रींचे शेला, पागोटेसह कपडे, अलंकार व रंगीबेरंगी आकर्षक रंग भरण्याचे कामाची लगबग सुरू आहे.
वाळवा तालुक्याच्या पश्चिम टोकावर शिराळा-आष्टा या रस्त्यालगत शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या कर्मभूमीतील ऐतवडे बुद्रुक येथील कुंभार समाजातील अनेक कुटुंबे आहेत. ढगेवाडी फाट्यावर ही कुटुंबे राहत आहेत. कुंभार कुटुंबातील चार-पाच मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करत असल्याने ढगेवाडी फाट्यावर गणेश मूर्तीचे आगरच तयार झाले आहे. ढगेवाडी फाट्यावर अनेक वर्षापासून दुर्गामाता, गौरी गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.
श्रीमती अपर्णा सागर कुंभार यांचे पियुष गणेश आर्ट, सुरेश नामदेव कुंभार यांचे सुरेश गणेश आर्ट, रोहित अशोक कुंभार यांचे राजेश गणेश आर्ट तसेच शुभम प्रताप कुंभार आर्ट या सर्वांचेच प्रतिवर्षी घरगुती गणेश मूर्ती अतिशय कलात्मक, सुबक व उठावदार मूर्ती करण्याचे काम सुरू असते. येथे आठ इंचापासून ते सात फुटापर्यंत उंचीचे आकर्षक गणेश मूर्ती उपलब्ध असतात. गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असल्यामुळे मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत.
- मातीच्या गणोबाचे महत्त्व
अलीकडे शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणेशमूर्ती सर्वत्र मिळतात. परंतू मातीच्या गणोबाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे इतर छोट्या मोठ्या गणपती बरोबरच मातीचा गणोबा ही पूजेला घ्यावाच लागतो. तर अनेक लोक हे केवळ मातीचाच गणोबा घेऊन गणेश उत्सव साजरा करतात. त्यामुळे मातीच्याच गणोबाची अलीकडे मागणी वाढत आहे.
- महिला मूर्तिकार अपर्णा कुंभार
सागर शंकर कुंभार यांनी इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपला पारंपारिक व्यवसाय सुरू केला होता. वडील पोलीस खात्यात सेवेत होते. तसेच आई शकुंतला कुंभार ऐतवडे बुद्रुकच्या उपसरपंच होत्या. त्यांचा त्यांना लाख मोलाचा आधारवड मिळाला. त्यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली संसाराचा गाडा त्या चालवत आहेत. सागरसह तीन भावंडे तिघेही एकदम शांत संयमी आहेत. ऐतवडे बुद्रुक परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबाने एक आगळा वेगळा नावलौकिक मिळवलेला आहे. सर्व सुरळीत चालू असताना सागरचे अल्पशा आजाराने निधन झाले. सागरचा संसार अर्ध्यावरच मोडला. सागरला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या संसाराचा भार पत्नी अपर्णा कुंभार यांच्यावर पडला. तिने न डगमगता हा पारंपारिक व्यवसाय हिमतीने आणि जिद्दीने पुढे चालवला. या व्यवसायाच्या जोरावर त्या संसाराचा गाडा चालवत आहेत.