जालंधरमध्ये ‘आयारामां’मध्ये लढत
पंजाबमधील जालंधर हा मतदारसंघ वैशिष्ट्यापूर्ण उमेदवारांमुळे लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघात एक माजी मुख्यमंत्री आणि तीन पक्षबदलू उमेदवारांमध्ये लढत होत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हे या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढत आहेत. आम आदमी पक्षाकडून पवन कुमार टीनू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. टीनू हे अकाली दलाचे माजी आमदार आहेत. नुकताच त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आम आदमी पक्षाने प्रथम या जागेसाठी विद्यमान खासदार सुशिल रिंकू यांचे नाव घोषित केले होते. तथापि, रिंकू यांनी अचानक भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आणि भारतीय जनता पक्षाची उमेदवारी प्राप्त केली. त्यामुळे आम आदमी पक्षाने अकाली दलातून आलेल्या माजी आमदाराला आपली उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारांचाच बराच गोंधळ होण्याची शक्यता तज्ञ बोलून दाखवित आहेत. तीन पक्षबदलू उमेदवार आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यातील या संघर्षात कोणाचे पारडे जड ठरणार, हे आपल्याला 4 जूनलाच समजून येणार आहे.
सर्वोच्च नेता देणारा मतदारसंघ
जालंधर या मतदारसंघाने भारताला एक वर्षासाठी सर्वोच्च नेता दिला होता. सध्या अनेकांच्या विस्मरणात ही बाब गेलेली आहे. 1997 ते 1998 या काळात साधारणत: 11 महिन्यांसाठी इंद्रकुमार गुजराल हे भारताचे सर्वोच्च नेते झाले होते. त्यांनी एच. डी. देवेगौडा यांची जागा घेतली होती. तथापि गुजराल यांचे पदही अल्पकालीनच ठरले. पण त्यामुळे जालंधर या मतदारसंघाची नोंद मात्र झाली.