For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीती... (भय इथले संपत नाही)

06:54 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
भीती     भय इथले संपत नाही
Advertisement

हॅलो मॅडम, मी रीमा बोलते. नमस्कार!! बोला ना. मॅडम, कसे सांगावे तेच कळत नाही, माझा मुलगा निहार हल्ली खूप विचित्र वागतो. म्हणजे? काय सांगू..मांजराला फार घाबरतो. मांजर पाहिलं की धडधडतं म्हणतो. मला काही सुचत नाही. मांजरासारखा प्राणी त्यात काय घाबरण्यासारखे आहे मलाच कळत नाही. शेजारची मुलगी लहान असुनही खेळते मांजरांसोबत आणि हा मुलगा असुनही घाबरतो. सगळे चिडवतात. मला लाज वाटते. घाबरतो की नाटक करतो त्याचे त्यालाच माहीत.

Advertisement

बरं, तुमच्याजवळ मी नंतर बोलते. निहार आहे का? मला बोलायचे आहे त्याच्याजवळ. हो आहे ना. असे म्हणत त्यांनी निहार जवळ फोन दिला. तू प्लीज जा मम्मा..मी बोलतो त्यांच्याजवळ. या त्याच्या वाक्यातून आणि त्याच्या आईच्या एकंदरच बोलण्यातून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या. निहारजवळ वीस पंचवीस मिनीटे चर्चा झाली. भेट आवश्यक होती. भेटण्यासाठी तो तयारही झाला. नंतर प्रत्यक्ष भेटीत बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. बोलताना निहारचे उत्तम सहकार्य, त्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळे भीती बाजूला करण्यात यश मिळाले.

निहारसारखी अनेक माणसे भेटत असतात. परंतु आजही आपल्या समाजामध्ये जेंडर रोलचा पगडा पहायला मिळतो. उदा. स्त्राrने अमुक कामे करायची, पुरुषांची कामे वेगळी अशी वर्गवारी पहायला मिळते. किंवा पुरुष आहेस वा मुलगा आहेस मग रडायचे नाही किंवा घाबरायचे नाही हा जणू अलिखित नियमच!! खरेतर स्त्राr किंवा पुरुष हे शिक्के न मारता त्या पलीकडचे माणूसपण समजून घेणे आवश्यक आहे. स्त्राr काय किंवा पुरुष काय भावना या असणारच आहेत. शरीरासारखे मनही आजारी पडू शकते हेही लक्षात घ्यायला हवे.

Advertisement

भीती ही एक अनैच्छिक प्रतिक्रिया आहे. समजा आपण रस्त्यावरुन चालतो आहोत. अचानक एक भला मोठ्ठा कुत्रा अंगावर धावून आला. त्याक्षणी विचार करायला आपल्याला वेळ मिळतो का? या संकटातून बाहेर पडण्यासाठी शरीर-मनामध्ये काही बदल क्षणार्धात घडतात. भीती आणि क्रोध अशा संरक्षक प्रतिक्रिया तात्काळ व्हायला हव्यात म्हणून त्या बऱ्याच अंशी नियंत्रणाखाली नाहीत. माणसाचे संकटापासून संरक्षण करण्यासाठी भीती अर्थात क्षणार्धात दक्ष करण्याचे काम एन्डेनालाईन हार्मोन करतात. क्षणार्धात शरीरात त्याचे प्रमाण वाढते, हदयाचे ठोके वाढतात, शरीराला होणारा शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढतो, श्वासाची गती वाढते. हात-पाय शरीरात वाढलेली रक्ताची गरज पूर्ण होते. डोळ्यातील बाहुली मोठी होते. लांबचे दिसण्यासाठी नजर तीक्ष्ण होते. शरीराच्या हालचाली अधिक वेगाने होतात. काही वेळ शरीराची सर्व शक्ती संरक्षक उपायांसाठी राखून ठेवण्यासाठी पचनासारखी कामे तात्पुरती बंद केली जातात. हे सर्व परिणाम त्याक्षणी शरीराला अधिक बळ प्राप्त करुन देतात आणि संकटापासून आपण पळू शकतो. अगदी नैसर्गिक रीतीने हे सर्व बदल होतात. समोर आलेला धोका मोठा असेल तर त्याक्षणी पळणे गरजेचे असेल तर भीती निर्माण होते. जर आपण संकटाचा सामना करणार असलो तर क्रोध निर्माण होतो आणि आपण संकटाशी सामना करायला सज्ज होतो. जर काहीच करता येत नसेल तर आपली स्थिती फ्रिज झाल्यासारखी होते. फ्लाईट-फाईट-फ्रीज या आदिम प्रेरणा आहेत. अर्थात त्याक्षणी तशी प्रतिक्रिया घडणे हे अगदी नैसर्गिक असते. परंतु समजा ती गोष्ट घडून गेली म्हणजे समजा कुत्रा अंगावर येतो आहे म्हटल्यावर भीतीमुळे आपण पळण्यासाठी सज्ज झालो हे ठीकच. परंतु तो प्रसंग घडून गेला आणि नंतर आपण शांतपणे घरात बसलेलो असताना रस्त्यावर कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला त्या आवाजानेच भीती उत्पन्न झाली आणि पुन्हा शरीरामध्ये तशा क्रिया घडू लागल्या तर मात्र सारे अवघड होईल.

चिंता व भीती संपूर्णपणे टाळणे अशक्य आहे. प्रत्येकाला आपापली दु:खे, चिंता, भीती असतेच. अनेकवेळा आपल्याला भीती वाटते आहे की नाही यापेक्षा त्या भयाला बाजूला करुन आपण आपले कर्तव्य पार पाडतो आहे की नाही हे अधिक महत्त्वाचे असते. काही गोष्टींची भीती आपण समजू शकतो पण काही मात्र अनाकलनीय असते. निहार मांजराला घाबरतो. मांजर दिसले की जागच्या जागी खिळून राहतो. मांजराचे चित्र जरी पाहिले तरी त्याच्यासाठी फार अवघड होते. अशी भीती साधीसुधी नाही. याला फोबिया म्हणतात.

भीती विकृत झाली की तिचे रुपांतर फोबियामध्ये अर्थात भयगंडात होते. भीती विकृत झाली, भीती निरर्थक आहे हे माहीत असूनही टाळता येईनाशी झाली की ती फोबियात बदलू लागते. त्यामध्ये एखाद्या वस्तूची, विशिष्ट परिस्थितीची तीव्र अनाकलनीय भीती वाटते. अशी वाटणारी भीती ठीक नाही हे कळत असले तरी ती भीती वाटतेच. ‘कळतं पण वळत नाही’ अशीच काहीशी स्थिती असते. भयभीत करणारी वस्तू वातावरण टाळले की भीती कमी होते. फोबियाचे वर्गीकरण तीन वर्गात केले जाते. अगोरा फोबिया, सोशल फोबिया, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट प्रकारचा फोबिया. अगोरा या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ‘बाजार’ यामध्ये रुग्णाला गर्दीतून जिथून सुटणे कठीण आहे अशा जागांचा फोबिया असतो. सोशल फोबियामध्ये माणसांमध्ये मिसळणे टाळले जाते. इतर सर्व प्रकारांचे भय भयगंडाच्या तिसऱ्या प्रकारात मोडते. उदा. विविध वस्तू, आजार, मृत्यू याचे भय. उंदीर, पाली, झुरळ यांना घाबरणारी माणसे अनेकदा विनोदाचा विषय होतात परंतु ही भीती फोबियापर्यंत जाऊ शकते. सर्व फोबियांमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे फोबिक वस्तू टाळली की रुग्णाला हलके वाटते. परंतु त्या तात्पुरत्या सुटकेमुळे यावर मात करण्याचे प्रयत्न त्याच्या हातून होत नाहीत. भयगंड जेवढा तीव्र तेवढी टाळाटाळ अधिक. बऱ्याचदा ही भीती अनाठायी आहे हे कळते पण वळत नाही अशी बऱ्याचदा रुग्णांची स्थिती पहायला मिळते. त्याचे कारण असे आहे की, डोळ्यासमोर येते त्याची जागृत मनाला जाणीव होण्यासाठी 350मिनी सेकंद लागतात मात्र डोळ्यातील रेटिनामध्ये तयार झालेली लहर मेंदूतील भीती निर्माण करणाऱ्या भागापर्यंत पोहचविण्यासाठी अवघे पन्नास मिनी सेकंद लागतात. ती लहर आपल्या भावनिक मेंदूपर्यंत पोचलेली असते. त्यामुळे आपला भावनिक मेंदू त्वरित प्रतिक्रिया करतो म्हणूनच कळण्याच्या आतच वळलेले असते. नुसता विचार बदलून भीती कमी होत नाही, याचे हेच कारण आहे.

फोबिया होण्यामध्ये मेंदूतील जैवरासायनिक प्रक्रिया जशा कारणीभूत होतात तसेच मनावर कोरले गेलेले भीतीचे संस्कार व भीती कमी करण्याच्या प्रयत्नांची टाळाटाळ हे घटकही जबाबदार आहेत. अर्थातच एकाच लेखामध्ये हे सारे मांडणे शक्य नाही, त्यामुळे अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात..

- अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.