शेतकऱ्यांचे 10 मार्चला ‘रेल्वे चक्काजाम’
चालू आठवड्यात दिल्लीला धडक देण्याचाही इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन सुरूच आहे. याचदरम्यान, शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल आणि सर्वन सिंग पंधेर यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले. तसेच आमचा दिल्ली चलो मोर्चा पुढे ढकलण्यात आलेला नाही. चालू आठवड्यात शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीत गेल्यानंतर 10 मार्चला रेल्वेरोको करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला नाही. या आंदोलनातून आम्ही मागे हटलेलो नाही. केंद्र सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही रणनीती ठरवली आहे. आम्ही सध्याच्या आंदोलनस्थळी अधिकाधिक शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यासाठी प्रयत्नशील असून इतर सीमांवरही आणखी आंदोलकांना आणण्याचा प्रयत्न करू, असे जगजीत सिंह डल्लेवाल म्हणाले. तसेच 6 मार्च रोजी देशभरातील आमचे लोक रेल्वे, बस आणि विमानाने दिल्लीला येतील. त्यानंतर 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत रेलरोको आंदोलन करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंधेर यांनीही डल्लेवाल यांच्याप्रमाणेच भूमिका मांडली. खनौरी आणि शंभू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 14 मार्चला शेतकरी ‘किसान महापंचायत’ही घेणार आहेत. यात 400 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे ते पुढे म्हणाले. आंदोलक शेतकऱ्यांच्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन आणि कृषी कर्जमाफी यासह अनेक मागण्या आहेत.