फली नरीमन काळाच्या पडद्याआड
वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या दिग्गज विधिज्ञांमध्ये सामील फली एस. नरीमन यांचे बुधवारी सकाळी दिल्लीत निधन झाले आहे. ते 95 वर्षे वयाचे होते. मुंबईतील शासकीय कायदा महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते. मुंबई उच्च न्यायालयातून त्यांनी स्वत:च्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. नरीमन यांचा जन्म 10 जानेवारी 1929 रोजी रंगून (आता यंगून) येथे झाला होता.
देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांनी 1972-75 पर्यंत काम पाहिले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्याच्या निषेधार्थ नरीमन यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला होता. फली नरीमन हे 1991-2010 पर्यंत बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिले होते. फली नरीमन यांना 1991 मध्ये पद्मभूषण तर 2007 मध्ये पद्मविभूषणने गौरविण्यात आले होते. त्यांचे पुत्र रोहिंग्टन नरीमन हे पुढील काळात सॉलिसिटर जनरल झाले तसेच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले होते.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी फली नरीमन यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ते ‘महान बुद्धिवंत’ होते असे उद्गार काढले आहेत. फली नरीमन हे सर्वात उत्कृष्ट कायदातज्ञ होते. त्यांनी स्वत:चे जीवन सर्वसामान्यांसाठी न्याय सुलभ करण्याकरता समर्पित केले होते. नरीमन यांच्या निधनामुळे मला मोठे दु:ख झाले आहे. देवाने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी असे पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे.
लिव्हिंग लीजेंड होते!
फली नरीमन हे एक लिव्हिंग लीजेंड होते, त्यांना कायदा आणि सार्वजनिक जीवनाशी निगडित लोक नेहमीच स्मरत राहतील. स्वत:च्या कामगिरीबरोबरच ते स्वत:च्या तत्वांवर नेहमीच ठाम राहिल्याचे उद्गार काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी काढले आहेत. माणसांच्या चुकीवर हॉर्स ट्रेडिंग शब्दाचा वापर म्हणजे अश्वांचा अपमान असल्याचे फरीमन यांनी म्हटले होते अशी आठवणही सिंघवी यांनी करून दिली आहे.
कॉलेजियमच्या निर्मितीत भूमिका
फली नरीमन यांनी स्वत:च्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये युक्तिवाद केला आहे. एससी एओआर असोसिएशन प्रकरणामुळे कॉलेजियम प्रणाली अस्तित्वात आली. तर टीएमए पै प्रकरणामुळे अनुच्छेद 30 अंतर्गत अल्पसंख्याकांच्या अधिकारांची कक्षा निश्चित करण्यात आली होती