‘रेंट अ कॅब’ना स्पीड गव्हर्नन्स बसविण्याच्या मुदतीत वाढ
पणजी : रेंट-अ-कॅब वाहनांना स्पीड गव्हर्नन्स (गतीरोधक) बसवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 15 मेपर्यंत नव्याने मुदत देण्यात आली आहे. यापूर्वीची मुदत 7 एप्रिल होती. ती संपुष्टात आली असून ते उपकरण मिळत नसल्याने तसेच त्याची टंचाई असल्यामुळे अनेक वाहनचालकांना गतीरोधक बसवणे शक्य झाले नसल्याने त्यासाठी सरकारने मुदत वाढवून दिली आहे. रेंट-अ-कॅब वाहनांचे अपघात सातत्याने वाढत असल्यामुळे वाहतूक खात्याने त्या वाहनांना गतीरोधक बसवणे सक्तीचे केले आहे. त्या सक्तीसाठी अतिशय कमी दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत अपुरी असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली होती. त्या मुदतीत गतीरोधक बसवणे शक्य नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे होते परंतु सरकारने त्यांचे म्हणणे न ऐकता वाहतूक खात्याने 7 एप्रिलची मुदत दिली. त्यामुळे वाहनचालकांची गतीरोधक मिळवण्यासाठी आणि ते बसवण्यासाठी धावपळ सुरू झाली. परंतु ते बाजारात उपलब्ध नसल्यामुळे दिलेल्या मुदतीत बसवणे शक्य झाले नाही. शेवटी सरकारला मुदतवाढ देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दरम्यान, गतीरोधक बसवले की नाही याची तपासणी करण्याचे काम वाहतूक खाते चालू ठेवणार असून कारवाई होणार नाही, परंतु नवीन मुदतीत गतीरोधक बसवावे म्हणून समज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याची सक्ती असल्याची वाहतूक खात्याने पुन्हा एकदा आठवण कऊन दिली आहे.