पाच हमी योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा
अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष रेवण्णा यांची सूचना : कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : राज्य सरकारच्या पाच हमी योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा,या योजनांपासून कोणी वंचित राहू नये यासाठी जिल्हा पातळीवरील अंमलबजावणी समितीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे, अशी सूचना अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायतीच्यावतीने बुधवार दि. 18 रोजी जिल्हा पंचायतीच्या आवारात पाच हमी योजनांच्या अंमलबजावणी समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना एच. एम. रेवण्णा पुढे म्हणाले, गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती, अन्नभाग्य, युवानिधी या योजनांचा लाभ अनेकांनी घेतला आहे. या योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत या योजना पोहोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे हित जपण्यासाठी पाच हमी योजना देण्यात आल्या असून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन अंमलबजावणी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, हमी योजना जारी करून एक वर्ष उलटले. या योजनांसंबंधीच्या कोणत्याही तक्रारी, समस्या आल्या तर समितीने त्वरित त्या निवारण कराव्यात. जिल्हा व तालुका पातळीवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी व एच. एम. रेवण्णा यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते. जि. पं. चे उपसचिव बसवराज हेग्गनायक यांनी सूत्रसंचालन केले.