जि.पं.कडून कंत्राटी अभियंत्यांच्या नेमणूक प्रक्रियेला गती
कागदोपत्री छाननीसाठी जिल्हा पंचायतमध्ये गर्दी
बेळगाव : जिल्हा पंचायतीकडून रोजगार हमी योजनेतील कामे करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर अभियंत्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अभियंता पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी सोमवारी करण्यात आली. यासाठी उमेदवारांनी जि. पं. कार्यालयामध्ये गर्दी केली होती. रोजगार हमी योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विकासकामांचा आराखडा तयार करण्यासाठी अभियंत्यांची अत्यंत गरज आहे. रोहयो अंतर्गत अनेक विकासकामे राबविली जात आहेत. मात्र या कामांना मंजुरी देण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असल्याने विकासकामे राबविताना अडथळा निर्माण होत होता. यासाठी जिल्हा पंचायतीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. याद्वारे जिल्ह्यातून 624 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सदर अर्ज दाखल केलेल्या अभियंत्यांची मेरिटच्या आधारावर निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी कागदोपत्रांची छाननी करण्यात आली. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर पदे कंत्राटी तत्त्वावर भरून घेतली जात आहेत. मेरिट आधारावर निवड केली जाणार आहे. चार ते पाच ग्राम पंचायतींसाठी एक अभियंता पद भरले जाणार आहे. रिक्त असणाऱ्या पदांची संख्या निश्चित नसून आवश्यकतेनुसार ही पदे भरून घेतली जाणार आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची मेरिटनुसार भरती करून घेऊन उर्वरित उमेदवारांचीही टप्प्याटप्याने निवड केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यात आले असले तरी मूळ कागदपत्र पुन्हा एकदा तपासून निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे जि.पं. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.