वीरभद्रनगर परिसरात पाईप घालण्यासाठी खोदाई सुरूच
रस्त्यांची पुन्हा खोदाई : जनतेतून तीव्र संताप : संपूर्ण काम पूर्ण केल्यानंतरच रस्ते खुले करण्याची मागणी
बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील रस्ते, गटारी, पदपथ तयार करण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा पाईप घालण्यासाठी खोदाई केली जात आहे. शहराध्ये विविध ठिकाणी असे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे बेळगावच्या जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याचे पाईप, ड्रेनेज पाईप, घातले जात आहेत. वीरभद्रनगर येथे मोठे पाण्याचे पाईप घालण्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची पुन्हा खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात आहे. वीरभद्रनगर परिसरात पदपथाला लागून पाईपलाईन घातली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खोदाई सुरू आहे. त्याठिकाणी संपूर्ण दगड असल्यामुळे तो दगड फोडताना मोठी कसरत करावी लागत आहे. काहीवेळा तर जिलेटिनचाही वापर केला जात आहे. त्यामुळे येथील घरांनाही धोका निर्माण झाला आहे. जेसीबीच्या साहाय्याने दगड फोडणे कठीण होत असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी
सदर काम हे रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच करणे गरजेचे होते. पण रस्त्या झाल्यानंतर हे काम करत असल्यामुळे आता रस्ताही खराब होत आहे. महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने हे काम पूर्ण करा, अशी मागणी होत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभे करून रस्ता देखील अडविला जात आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे. तेव्हा संपूर्ण काम पूर्ण करावे आणि रस्ते खुले करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.