सर्वांनाच त्रितापामुळे दु:खे भोगावी लागतात
अध्याय पहिला
मला शरण ये म्हणजे कायम आनंदात राहशील असे बाप्पांनी सांगितलं. असं न करणारा सदैव असमाधानी असतो. त्याच्या इच्छा, वासना त्याच्यावर राज्य करत असतात. त्यामुळे त्याला राग चटकन येतो. अशा वेळेस त्याला ईश्वरी सत्तेचा विसर पडलेला असल्याने त्याची भ्रष्ट झालेली बुद्धी त्याचा सर्वनाश घडवून आणते. असं घडू नये म्हणून इच्छा पूर्ण होणं व न होणं हे दोन्हीही आपल्या प्रारब्धानुसार घडत असतं ही बाब जो लक्षात घेईल त्याला त्याच्या इच्छापूर्तीच्या आड जो येईल त्याचा राग येणार नाही व द्वेष वाटणार नाही. जो इच्छापूर्तीसाठी अनुकूल भूमिका घेईल त्याबद्दल प्रेमही वाटणार नाही. जो सदैव ईश्वरस्मरण करेल त्याची बुद्धी कधीही भ्रष्ट होत नसल्याने वरील सिद्धांत तो विसरणार नाही. त्यामुळे विषयसेवन मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक अशी मन:स्थिती तयार झाल्याने तो समाधानी असेल म्हणून कायम समाधानी राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे कायम ईश्वर स्मरण करणे हा होय.
समाधानी मनुष्य त्रिविध तापातून मुक्त होतो असं बाप्पा आपण सध्या अभ्यासत असलेल्या त्रिविधस्यापि दु:खस्य संतोषे विलयो भवेत् । प्रज्ञया संस्थितश्चायं प्रसन्नहृदयो भवेत् ।। 62 ।। ह्या श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या दु:खाचा समाधानामध्ये लय होतो. मनुष्य स्थितप्रज्ञ असला म्हणजे प्रसन्नचित्त होतो.
सर्वच माणसांना जीवनात तीन प्रकारच्या तापातून निर्माण होणारी दु:खे भोगावी लागतात. त्याला त्रिताप किंवा तापत्रय असं म्हणतात. चिंता, व्याधी, वृद्धपणातील परावलंबित्व, शोक अशी मानसिक दु:खे तसेच देहामुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना यांना आध्यात्मिक ताप असं म्हणतात. सभोवतालचे लोक, चोर दरोडेखोर इत्यादींच्यामुळे तसेच प्राण्यांच्यामुळे जे दु:ख भोगावे लागते त्याला आधिभौतिक ताप असे म्हणतात. महापूर, वादळ, भूकंप अशा नैसर्गिक कारणामुळे जे दु:ख भोगावे लागते त्याला आधिदैवीक ताप असं म्हणतात. हे ताप मानसिक त्रासामुळे भोगावे लागतात. त्यांना क्लेश असे म्हणतात. पतंजली योगदर्शनानुसार अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि या सगळ्याचा मनावर होणारा परिणाम या पाचही चित्ताच्या अवस्थांना क्लेश अशी संज्ञा आहे. मी म्हणजे हा देह आणि समोर दिसणारी दुनिया खरी आहे असे वाटणे ह्या गैरसमजुतीला अविद्या असे म्हणतात. ही अविद्याच पुढील चार क्लेशांची जननी असते. या क्लेशांमुळेच पाप-पुण्यरूप कर्म जीवात्म्याकडून घडत असते. त्याच्या योगाने पाप, पुण्य निर्माण होते. या पुण्य-पापामुळे पुढील जन्मी मानवांपेक्षा खालच्या योनी, मानवयोनी आणि मानवांपेक्षा वरच्या देवयोनी यांची प्राप्ती होते. या सर्व योनींमध्ये सुखदु:खाचे भोग प्राप्त होतात. म्हणून देवीच्या आरतीत क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा अशी प्रार्थना केली आहे. क्लेशापासून मुक्ती हेच सर्व स्तोत्रांचे, आरत्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्थिरबुद्धि, स्थिरप्रज्ञ व्यक्तीच्या आयुष्यातही सामान्य माणसाप्रमाणे वर वर्णन केलेले ताप येत असतात पण त्याच्या मनात समाधान विलसत असल्याने तो अशा निरनिराळ्या प्रकारच्या तापदायक काळात स्वत:ला क्लेश करून न घेता स्वस्थचित्त असतो व सर्वांचे कल्याण व्हावे असे म्हणत असतो. थोडक्यात असा मनुष्य कायम समाधी अवस्थेत असतो असं म्हणायला हरकत नाही.
इच्छा पूर्ण होत नाहीत असं दिसलं की, माणूस रागावतो आणि मूर्खासारखा वागू लागतो. आपलंच म्हणणं बरोबर आहे, मी शहाणा, मी सांगतोय तेच खरं असं वाटायला लागून देहबुद्धी जोर करते. त्यामुळे ईश्वराचा विसर पडतो. तो ईश्वरापासून लांब जाऊ लागतो. परिणामी बुद्धी भरकटून त्याचा सर्वनाश होतो.
क्रमश: