नदीला पाणी येऊनसुद्धा खानापूर शहराचा पाणीपुरवठा ठप्पच
पाणीपुरवठा करण्याची नागरिकांतून मागणी : नगरपंचायतीच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह
खानापूर : खानापूर शहराचा पाणीपुरवठा मलप्रभा नदीत पाणी नसल्याने गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपूर्वी मलप्रभा नदीला पाणी येऊनसुद्धा अद्याप शहराचा पाणीपुरवठा सुरू नसल्याने नागरिकांतून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे. मागीलवर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने नदीचे वाहणारे पाणी डिसेंबर महिन्यातच बंद झाले होते. त्यामुळे नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहराचा पाणीपुरवठा डिसेंबरमध्येच बंद करण्यात आला होता. कूपनलिकेवरच शहरातील नागरिकांना अवलंबून रहावे लागले होते. मागील पंधरा दिवसात खानापूर तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने मलप्रभा नदीचे पाणी प्रवाहित झाले. गेल्या दहा दिवसापासून मलप्रभा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे. मात्र नगरपंचायतीने शहराचा पाणीपुरवठा अद्याप सुरू केलेला नाही. त्यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी नदीला नव्याने पाणी आल्यानंतर एक-दोन दिवसातच पाणीपुरवठा सुरू करण्यात येत होता. मात्र यावर्षी दहा दिवस झाले तरी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने नगरपंचायतीच्या या कारभारामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.