शनिवार उलटला तरी पर्वरी, साळगावला नाही मिळत पाणी!
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती ठरली खोटी
पणजी : तिळारी धरणाचे गोव्यातील पाणी शनिवारपासून सुरू होणार, अशी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिलेली माहिती खोटी निघाली असून पर्वरी, साळगाववासियांत शिरोडकरांबद्दल संताप निर्माण झाल्याचे गेल्या तीन दिवसांपासून दिसून येत आहे. पर्वरी व साळगाव मतदारसंघातील पाणी समस्या बिकट झाली असून नाताळाच्या काळातही लोकांना हाल सोसावे लागल्याने तेथील रहिवासी संतापले आहेत. मंत्री खोटी माहिती देऊन फसवतात असे आरोपही तेथील रहिवासी करीत आहेत. तिळारीचे पाणी न आल्याने पर्वरी पाणीप्रकल्प अजूनही ठप्पच असून तो 27 डिसेंबरपूर्वी सुरू होणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले.
शनिवार उलटला, पाणी नाहीच
तिळारीचे पाणी बंद होऊन महिना उलटला असून अजूनही तेथील धरणाचे दुरूस्तीकाम चालू असल्यामुळे पाणी गोव्यात येत नाही. असे असतानाही मंत्री शिरोडकर यांनी दुरूस्तीकाम संपल्याचे सांगून शनिवारपासून पाणी सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु अद्यापही तेथील पाणी गोव्यात येत नसल्याने रहिवाशांचे पाण्यासाठी हाल सुरूच आहेत.
पर्वरी पाणी प्रकल्प ठप्प
पर्वरी प्रकल्पात पाणीच येत नसल्याने तो बंद पडला आहे. त्याला आता महिना उलटून गेला असून तो कधी सुरू होणार आणि तिळारीचे पाणी कधी येणार याबाबत कोणाला काहीच माहीत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे लोक पाण्यासाठी टँकरची मागणी करतात परंतु पाणीच नसल्याने ते टँकरमधून देता येत नाही अशी परिस्थिती आहे.
आनंदावर पडले विरजण, नशिबी आली पुन्हा वणवण !
पर्वरी व साळगांव मतदारसंघाला त्याचा फटका बसला असून पाण्यासाठी तेथील रहिवाशांची गेल्या महिनाभरापासून वणवण सुरू आहे. पाणी एक दिवसाआड सोडण्यात येते असे सांगण्यात येते, परंतु अनेक दिवस नळाला पाणीच येत नाही, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत. मंत्र्यांनी शनिवारपासून पाणीपुरवठा सुरु होईल, अशी घोषणा केल्यानंतर या लोकांना आनंद झाला होता, पण प्रत्यक्षात त्यांच्या आनंदावर विरजण पडले, आणि पाण्यासाठी वणवण नशिबात आली, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.