क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान 10 हजार लोकांचे स्थलांतर
डीआरडीओकडून ओडिशात चाचणी यशस्वी
► वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
‘डीआरडीओ’ने चांदीपूर-बालासोर येथील तळावरून बुधवारी सायंकाळी 4:25 वाजता एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली. या चाचणीवेळी कोणताही अनुचित प्रसंग उद्भवू नये यासाठी तळानजिकच्या दहा गावांमधील सुमारे साडेदहा हजार लोकांना तात्पुरत्या कालावधीसाठी स्थलांतरित करण्यात आले होते. क्षेपणास्त्र प्रक्षेपणामुळे प्रभावित झालेल्या लोकांना शाळा आणि तात्पुरत्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले होते. तसेच लोकांच्या मदतीसाठी सरकारी अधिकारी आणि पोलीसही तैनात करण्यात आले होते.
डीआरडीओने बुधवारी सकाळपासून क्षेपणास्त्र चाचणीची तयारी सुरू केली होती. मात्र प्रतिकूल हवामानामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्याच वेळी, चाचणी क्षेत्राच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून अन्यत्र हलवून तात्पुरत्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले होते. या निवासी छावण्यांमध्ये त्यांच्या खाण्या-पिण्यासह इतर व्यवस्था करण्यात आली होती.
क्षेपणास्त्राची चाचणी बालासोरच्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंजच्या (आयटीआर) लॉन्च पॅड-3 वरून करण्यात आली. याशिवाय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने अद्याप क्षेपणास्त्राशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. तथापि, क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी वेगवेगळ्या टप्प्यात तयारी केली जाते, असे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
स्थलांतरासाठी लोकांना प्रत्येकी 300 ऊपये नुकसानभरपाईही देण्यात आली आहे. मात्र, याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनकडून मिळणारी भरपाई खूपच कमी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून तात्पुरत्या विस्थापितांसाठी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या भरपाईच्या रकमेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच लाँचिंग रेंजमध्ये एक तलाव असून, तेथे काम करणाऱ्या मच्छीमार आणि शेतमजुरांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, असेही सांगितले. यासंदर्भात बालासोरच्या एसडीएम यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील, असे ग्रामस्थांनी सांगितले.
पहाटे 4 वाजता घर सोडण्याचे आदेश
क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या आधी प्रक्षेपण पॅडच्या 3.5 किमी परिघात राहणाऱ्या 10,581 लोकांना प्रशासनाने स्थलांतरासंबंधी अगोदरच कल्पना दिली होती. लाँचिंग पॅडनजिकच्या लोकांना बुधवार, 24 जुलै रोजी पहाटे 4 वाजता घरातून बाहेर पडून तात्पुरत्या शिबिरात जावे लागेल, असे जिल्हा प्रशासनाने लोकांना सांगितले होते. क्षेपणास्त्र चाचणीनंतर आता प्रशासन माहिती देईल तेव्हाच हे सर्वजण आपापल्या घरी परतू शकतात.