प्रवेशद्वार...2
उत्तरार्ध
आता उंबरठा म्हटलं की आमच्या प्रत्येक घराला असतोच. ज्याच्यावरती गोपद्म, सुंदर रांगोळ्या रेखाटलेल्या असतात. हाच उंबरठा आमच्या घरात येणाऱ्या बाळ गोपाळांचं जसं स्वागत करतो तसंच येणाऱ्या नववधूचंसुद्धा स्वागत करतो. या उंबऱ्यावर ठेवलेलं माप ओलांडून घरात यायची प्रथा आमच्याकडे आहे. परंतु असा उंबरठा ओलांडून एखादी स्त्राr करिअरसाठी कायमची जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला मात्र तिला तिच्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतात. अशीही उदाहरणं आम्ही पाहतो. आमच्या डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या किल्ल्यांनासुद्धा दरवाजे असायचे. याचं एक कायम स्मरणात राहिलेले उदाहरण म्हणजे छत्रपतींनी रायगडावरती राजधानी हलवली आणि त्या ठिकाणी भक्कम तटबंदी बांधून गडाला मोठा दिंडी दरवाजा देखील केला. हा दिंडी दरवाजा ठराविक वेळेला बंद होणार आणि ठराविक वेळेला उघडणार, असा शिरस्ता त्यांनी घालून दिला होता आणि त्यामुळेच हिरकणी जी दूध विकायला गडावरती आली होती तिला आपल्या मुलापर्यंत जायला गडावरनं वेगळी वाट शोधायला लागली. त्याचवेळी गडाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. हिरकणीमुळे गडाची सुरक्षितता आणखीन भक्कम झाली. असा हा गडाचा दरवाजा. हा गड, किल्ला डोंगरावर जरी असला तरी गावातदेखील राजांचं अस्तित्व होतंच. प्रत्येक गावाचं असं एक छोटं राज्य असायचं. त्यामुळे प्रत्येक गावाला एक दार असायचं, त्याला वेस म्हणत. त्या वेशीतून बाहेर जाणं, वेशीजवळच्या देवाला जाणा, या सगळ्या घटना गावात घडत असायच्या. या वेशीमुळे त्या त्या गावाचे स्वभाव, संस्कृती, यात्रा, जत्रा, सगळे जपले जायचे. म्हणून ही वेस म्हणजेसुद्धा गावाचं दार. अशी वेस देवाच्या घरी जाण्यासाठीसुद्धा असतेच. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रेला जातो. त्यापैकी गंगाद्वार, हरिद्वार ही सगळी देवाच्या घरी नेणारी दारं. या दारापाशी गेल्यावर, तिथला उंबरठा ओलांडताना तुमचं स्वागत एखाद्या नववधू सारखं होणार असतं. अशावेळी आम्ही जीवनाचे सगळे पाश मागे सोडून जायला निघतो. आम्हाला कोणतेही मानसन्मान, वस्त्र, अलंकार सर्व काही नकोसं वाटायला लागतं. तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही या दारापाशी पोहोचलोय असं म्हणायला हरकत नाही. अशा दारांसमोर मी पणाच्या भिंती ढासळतात आणि खऱ्या अर्थाने मोक्षद्वारातून आपण स्वर्गस्थ होत असतो.