इंग्लंडने यष्टिरक्षक-फलंदाज बेअरस्टोला वगळावे : कूक
वृत्तसंस्था/ लंडन
माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने भारताविऊद्धच्या रांची येथील चौथ्या कसोटीतून यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोला वगळावे, असे मत व्यक्त केले आहे. यामुळे मालिकेत खराब कामगिरी झालेल्या सदर खेळाडूला जपता येईल, असे त्याने म्हटले आहे. बेअरस्टोने सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी करताना सहा डावांमध्ये 0, 4, 25, 26, 37 आणि 10 अशा धावा केलेल्या असून त्याची सरासरी 17 इतकी आहे.
कूकने ‘टीएनटी स्पोर्ट’ला सांगितले आहे की, मी त्या खेळाडूला जपण्यासाठी संघातून बाहेर काढावे अशा मताचा आहे. कारण मला वाटते की, त्याच्यासाठी आतापर्यंत दौरा कठीण गेला आहे आणि प्रयत्न चालू ठेवण्याच्या दृष्टीने भारत ही एक कठीण जागा आहे. तो पुन्हा कधीच कसोटी क्रिकेट खेळणार नाही असे मी म्हणत नाही, पण या मालिकेतील आतापर्यंतच्या सर्व घडामोडींपासून दूर आणि ताजातवाना असलेल्या एखाद्या खेळाडूला खेळविणे चांगले ठरेल, असे त्याने म्हटले आहे.
कूकने बेअरस्टोच्या जागी खेळविण्याच्या दृष्टीने डॅन लॉरेन्सला पाठिंबा दिला आहे. कारण सदर अष्टपैलू खेळाडू कोणत्याही सामान्यात खेळलेला नाही. इंग्लंड या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. दरम्यान, भारताने चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा जसा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे इंग्लंडने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यांनाही विश्रांती दिली पाहिजे, असे कूकने म्हटले आहे. अँडरसन व वूड हे प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत.
अंतिम सामना धर्मशाला येथे होणार आहे. तेथील परिस्थिती वेगवान गोलंदाजांना मदत करेल. मला वाटते की, जेम्स अँडरसन आणि मार्क वूड धर्मशालाच्या थंड परिस्थितीत खूप प्रभावी ठरतील. म्हणून मी त्यांना विश्रांती द्यावी, अशा मताचा आहे. कारण त्यांनी कमी कालावधीत बरीच षटके टाकली आहेत, असे कूकने म्हटले आहे. त्याने ऑली रॉबिन्सन आणि गस अॅटकिन्सन यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.