स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घ्या
बेळगाव सफाई कर्मचारी संघटनेचे प्रशासनाला निवेदन : आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात 25 हजारहून अधिक स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, त्यांना कामामध्ये कायम करून घेतले नसल्याने त्यांना अनेक सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना एकाचवेळी सेवेत कायम करावे, अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
मागील अनेक वर्षांपासून स्वच्छता करणे, गटारींची साफसफाई करणे, सुका व ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरावाहू वाहनांवरील चालक यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्यात आले आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्यसेवा मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक बोजा पडत आहे. अनेकवेळा मागणी करून देखील राज्य सरकारने स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
राज्य सरकारने न्याय द्यावा
1 जुलै 2022 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सफाई कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते. परंतु, राज्यात 25 हजारहून अधिक सफाई कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत असून सध्याच्या राज्य सरकारने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सध्या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हैसूर नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात असून, याचाच एक भाग म्हणून बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुनीस्वामी भंडारी, विजय निर्गट्टी, विजय कोल्हापुरे, राजेंद्र छाबरी, सुनील बन्सी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.