पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मानवी विकासावर भर
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे प्रतिपादन, सांगे येथे प्रजासत्ताकदिन कार्यक्रम
सांगे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता आणि विश्वगुरू बनण्याच्या मार्गाने जात आहे. मोदी यांनी देशाचा मानसन्मान, गौरव वाढविला आहे. मानवी विकास होणे आवश्यक असून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यादृष्टीने कार्य करत आहेत. गोव्यातही विकास झापाट्याने होत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 फेब्रुवारीला मडगाव येथे होणाऱ्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. सांगे उपजिल्हाधिकारी कार्यालय आवारात आयोजित प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर ते बोलत होते. यावेळी फळदेसाई यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप, मामलेदार गौरव गावकर याप्रसंगी हजर होते. भारताचे संविधान हे सर्व घटकांचे रक्षण करते. घटनेने आपल्याला जबाबदारी आणि कर्तव्यांची जाणीव करून दिलेली आहे. गोवा विकासाच्या बाबतीत नेटाचे पुढे जात आहे. विविध साधनसुविधा निर्माण होत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात ‘एनआयटी’ झाली. आता ‘आयआयटी’ येण्याच्या मार्गांवर आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.
निसर्ग आणि साहसी पर्यटन विकसित करण्यासाठी ‘ग्रामीण गोवा’ योजना तयार आहे. इको-टुरिझमला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यावर आणि लोकांना रोजगार देण्यावर भर दिला जाईल. साळावली येथे वीस कॉटेजिस सुरू होण्याच्या मार्गांवर आहेत. सांगेत येणारा पर्यटक येथे वास्तव्यास राहिला पाहिजे. तरच स्थानिकांना फायदा होईल. सांगे भागात निसर्ग तसेच साहसी पर्यटन विकसित करण्यास खूप वाव आहे. त्यादृष्टीने प्रयत्न चालू झालेले आहेत, असे फळदेसाई यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते साळावली येथील नियोजित ‘कुणबी हस्तकला ग्रामा’च्या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली. माझ्यावर टीका होते, तरीही मी गप्प आहे, असे जनतेला वाटत असावे. पण याचा अर्थ मी अपराधी किव्हा कमकुवत आहे असा मुळीच नाही. टीका करणाऱ्यांची कुवत पाहिली, तर त्यांना उत्तर देणे देखील अर्थहीन आहे, असे फळदेसाई म्हणाले. यावेळी फळदेसाई यांच्या हस्ते कलाकार तेजस वडील आणि त्यांचे सहकारी यांचा भव्यदिव्य रांगोळी घालून ‘कलाम वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सूत्रनिवेदन यतीन नाईक यांनी केले.