गुंजी परिसरात हत्तींचा धुमाकूळ सुरुच,भात पिकाचे नुकसान
वार्ताहर/गुंजी
गुंजी परिसरात हत्तीकडून भात पिकाचे नुकसान सुरूच असून, दुसऱ्या दिवशीही हत्तींनी धुमाकूळ घालून भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. शनिवारी रात्रीपासून या परिसरात एका हत्तीचे आगमन झाले होते. मात्र रविवारी रात्री हत्तींच्या संख्येमध्ये भर पडली असून, त्यांच्या पाऊल खुनावरून जवळजवळ चार ते पाच हत्ती असल्याचे शेतकऱ्यातून सांगितले जात आहे. रविवारी रात्रीही येथील शेतकरी धाकलू चौंडी यांच्या शिवारातील पुन्हा हत्तींनी उरले सुरलेही भात पीक खाऊन फस्त केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला असलेले शेतकरी रामू शिंदोळकर यांच्याही भात पिकाचा मोठ्या प्रमाणात फडशा पाडून प्रचंड नुकसान केले आहे.
त्यामुळे येथील शेतकऱ्यात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले असून ऐन सुगीतच हत्तींनी ठाण मांडल्याने येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. वर्षभर काबाडकष्ट करून आणि जंगली प्राण्यापासून संरक्षण करून राखलेली भात पिके सुगी हंगामात हत्तीकडून फस्त केली जात असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता पिकवलेली भात शेती हातातोंडाशी येऊन सध्या हत्तींच्या घशात जात असल्याने शेतकरी वर्ग हताश झाला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत सापडला आहे. तरी वन खात्याने सदर शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा व त्वरित हत्तींचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी होत आहे.