जलस्रोत-पर्यावरण राखण्यासाठी प्रयत्न आवश्यक
निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांचे प्रतिपादन : विविध ठिकाणी पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : जगभरातच प्रदूषण वाढले असून त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. याचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे तर मानवी समूहावरही होत आहे. प्रदूषण असेच वाढत राहिल्यास एक दिवस जमीन, जलस्रोत यांची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे हे सर्व स्रोत वाचविण्यासाठी, पर्यावरण राखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे मत निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी व्यक्त केले. बुधवारी मराठा मंडळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी होते.
एम. जी. हिरेमठ पुढे म्हणाले, अलीकडे दिवसेंदिवस तापमानही वाढत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान आपल्या नावाने एक तरी झाड वाढवावे. जेथे शक्य आहे तेथे वनराई उभी करणे आवश्यक आहे. मराठा मंडळने बरीच झाडे वाढविली असून या संस्थेला नॅकचे नामांकन मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे डॉ. डी. एन. मिसाळे यांनी परिसर वाचविण्यासाठी प्राणी, पाणी, झाडे आणि जमीन यांचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी वनखात्याचे अधिकारी सुरेश अरबिनहट्टी यांचेही भाषण झाले. प्राचार्य मोळेराखी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने एखादे तरी झाड लावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मल्लेश रोट्टी, जगदीश मठद, जे. आय. दळवाई व विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. ऋतुजा सप्ले हिने प्रार्थना सादर केली. प्रा. जे. एम. कर्की यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वेदा शिवपुजीमठ यांनी आभार मानले.
माहेश्वरी अंधशाळेत पर्यावरण दिन
माहेश्वरी अंध शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष वादीराज कलघटगी, सचिव चिंतामणी ग्रामोपाध्ये, पदाधिकारी गणेश हेगडे, राजशेखर हिरेमठ, कांतेश आचार्य, मुख्याध्यापिका अनिता गावडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात विविध प्रकारची रोपे लावली. याचवेळी जनजागृती करण्यासाठी दिंडी काढण्यात आली. सूत्रसंचालन सुमिता मिटगार यांनी केले.
जायंट्स प्राईड सहेलीतर्फे पर्यावरण दिन
जायंट्स प्राईड सहेलीतर्फे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त देसूर येथे जांभूळ आणि काजूची रोपे लावण्यात आली. या प्रसंगी सहेलीच्या अध्यक्षा मोनाली शहा, माजी अध्यक्षा आरती शहा, स्नेहल शहा, सुनीता व स्नेहल वसुलकर, अस्मिता जोशी उपस्थित होत्या.
काहेर विद्यापीठाच्या एनएसएस विभागातर्फे पर्यावरण दिन साजरा
काहेर विद्यापीठाच्या एनएसएस विभागातर्फे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त 105 रोपांची लागवड करण्यात आली. कुलगुरु डॉ. नितीन गंगाने यांनी हरित परिसर, स्वच्छ परिसर याबद्दल माहिती दिली. तसेच एनएसएसच्या छात्रांनी या रोपांचे संगोपन करावे, असे आवाहन केले. कुलसचिव डॉ. एन. एस. गणाचारी यांनी स्वागत केले. एनएसएस अधिकारी डॉ. आश्विनी नरसण्णावर यांनी आभार मानले.