शिक्षण हा मानवी विकासाचा मूलमंत्र
डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे उद्गार, 78 व्या वाढदिनानिमित्त देवाबाग, काणकोण येथे भव्य सत्कार
काणकोण : शिक्षण हा मानवी विकासाचा मूलमंत्र आहे. शिक्षणाच्या बाबतीत आजचा काळ खूपच अनुकूल असा आहे. ध्यास व अभ्यासाचा अवलंब करून भावी पिढीला चांगले शिक्षण द्या, मात्र त्यासाठी कोणत्याच प्रलोभनाला बळी जाऊ नका, असा सल्ला गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे निवृत्त प्रमुख व साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतातून दिला. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे ध्येयवादी उपासक, अभ्यासक, समीक्षक असलेल्या डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचा काणकोणच्या कोमरपंत समाजातर्फे त्यांच्या 78 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य सत्कार करण्यात आला. देवाबाग, काणकोण येथील श्री धालपुरुष कोमरपंत समाज, कोळंब येथील श्री देवगी पुरुष देवस्थान आणि घाणेबाग, तळपण येथील श्री सातेरी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने देवाबाग येथील भूमिपुरुष सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पर्यावरण तज्ञ प्रा. राजेंद्र केरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबईच्या कोमरपंत समाजाच्या अध्यक्षा स्मिता प्रेमानंद नाईक निमंत्रित पाहुण्या, तर प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेले बाबू कोमरपंत अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर रघुवीर कोमरपंत, संतोष कोमरपंत, चंद्रकांत मेत्री त्याचप्रमाणे मंदा सोमनाथ कोमरपंत यांचाही समावेश होता. प्रा. केरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन डॉ. कोमरपंत यांचा सत्कार करण्यात आला, तर सौ. मंदा कोमरपंत यांची सौ. वनिता नाईक यांनी ओटी भरली. सर्व प्रकारच्या जैविक संपदेच्या बाबतीत भारत अग्रेसर असून येथील संपदा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारी पिढी निर्माण झाली. गोवा मुक्त झाला नसता, तर आपण कोठच्या कोठे भरकटत गेलो असतो. भारतात जन्म घेणे ही देवदुर्लभ गोष्ट असून उच्च शिक्षणासाठी परप्रांतात जाण्याची आज गरज नाही हे सांगताना डॉ. कोमरपंत यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यासारख्या अनेक वैज्ञानिकांची उदाहरणे दिली.
डॉ. कोमरपंत हे प्रेरणास्रोत : केरकर
डॉ. सोमनाथ कोमरपंत हे अजातशत्रू आणि अमर्याद शक्तीचे प्रेरणास्त्रोत असून समाजाचे भूषण आहेत. माणसाने आपले जीवन जगताना डॉ. कोमरपंत यांचा आदर्श समोर ठेवावा आणि नव्या पिढीने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले. मराठी-कोकणीच्या वादामुळे इंग्रजीचे फावले. इंग्रजी समाजाची भाषा बनली, असे मत त्यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी पैसे मोजून सत्कार घडवून आणले जातात. काणकोणात मात्र एका संवेदनशील व्यक्तीचा सत्कार करण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे ते म्हणाले. केरकर यांनी पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन करतानाच रामाचे भूशीर, अंजदीव बेट, श्री मल्लिकार्जुन देव, कोमरपत समाजाचा इतिहास तसेच येथील तळपण, गालजीबाग, साळेरी, वाकडी या नद्या यावर भाष्य केले. स्मिता नाईक यांनी डॉ. कोमरपंत हे परिश्रम, भक्ती आणि निष्ठा यांचा त्रिवेणी संगम असून विद्वान आणि नम्र व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सूरज कोमरपंत यांनी केले. योजना कोमरपंत यांनी मानपत्राचे वाचन केले. बाबू कोमरपंत यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सुविधा कोमरपंत, वैष्णवी कोमरपंत, शुक्ला कोमरपंत, श्रुती नाईक, समृद्धी कोमरपंत, शिवम नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. श्रुती नाईक यांनी प्रा. केरकर यांचा, तर शिवम नाईक यांनी डॉ. कोमरपंत यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रा. राजेंद्र केरकर आणि स्मिता नाईक यांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.
शिक्षकांनी राष्ट्रभक्ती रुजविली
आपल्याला राष्ट्रभक्ती आपल्या शिक्षकांनी शिकविली. त्या शिक्षकांनी पडद्यामागे राहून काम केले. त्यात स्व. ह. रा. प्रभू, यशवंत नाईक, प्रफुल्ला गायतोंडे. शिवानंद गायतोंडे, अनंत गावकरसारख्या शिक्षकांचा समावेश होतो असे सांगून त्यांच्याविषयी डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी ऋणनिर्देश व्यक्त केला. या शिक्षकांनी राष्ट्रवादाचे शिक्षण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि ज्या ज्या विद्यालयांतून शिक्षण घेतले त्या शिक्षणसंस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.