केजरीवाल यांना ईडीचे पुन्हा समन्स
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याच्या संदर्भात प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) पुन्हा समन्स पाठविले आहे. चौकशीसाठी समन्स पाठविण्याची ही चौथी वेळ असून आतापर्यंत केजरीवाल यांनी ते टाळले आहे. आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्याचा कट भारतीय जनता पक्षाने रचला असून त्यासाठी आपल्याला गोवण्यात आल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. ईडीने त्यांना 18 जानेवारीला चौकशीसाठी पाचारण केले आहे.
याच मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया कारागृहात आहेत. पण त्यांना पत्नीच्या आजारीपणामुळे पॅरोलवर काही काळासाठी बाहेर जाण्यास अनुमती देण्यात आली होती. दिल्ली सरकारच्या मद्यविषयक नव्या धोरणामुळे मद्यसम्राटांना मोठा लाभ झाला आहे. त्यांना लाभ व्हावा यासाठीच असे मद्यधोरण निर्धारित करण्यात आले आहे, असा ईडीचा आरोप आहे. याच प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते संजयसिंग हेही कारागृहात आहेत.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसून केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सूडबुद्धीने ही कारवाई चालविली आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तर केजरीवाल निर्दोष असतील त्यांनी समन्स वारंवार टाळण्याचे कारण काय ? असा प्रतिप्रश्न भाजपने केला आहे.