Satara News : साताऱ्यात खा. उदयनराजे यांनी वाहिली 26/11तील शहिदांना श्रद्धांजली
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या शहीदांना साताऱ्यात भावपूर्ण श्रद्धांजली
सातारा : मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली, सदर बझार येथील शहीद अशोक कामटे उद्यानात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उदयनराजेंनी अशोक कामटे यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
२६ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत लष्कर-ए-तैयबाच्या दहा सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला घडवला, सुमारे ६० तास ही चकमक चालली, यात १६६ निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले तर ३०० हुन अधिक नागरिक जखमी झाले. हल्लेखोरांनी शहरात उतरून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर गोळीबार, स्फोट केले होते. यामध्ये जगप्रसिद्ध ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, नरीमन हाऊस (ज्युईश कम्युनिटी सेंटर), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, कॅफे लिओपोल्ड, कामा हॉस्पिटल, मेट्रो सिनेमा परिसर लक्ष केले.
नॅशनल सिक्युरिटी गार्ड, मुंबई पोलीस, मरीन कमांडोज यांनी संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये नऊ दहशतवादी चकमकीत ठार केले तर एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले. कसाबवर भारतात खटला चालवून त्याला २०१२ साली फाशीची शिक्षा देण्यात आली. या कार्यक्रमास निशांत पाटील, शंकर माळवदे, वैभव पोतदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.