‘मुक्या’ जनावरांनी फोडली खुनाला ‘वाचा’
धन्याच्या खुनाचे उलगडले रहस्य : लहान भावाकडूनच मोठ्या भावाचा घात : यमकनमर्डी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
क्लिष्ट गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात काहीवेळा तंत्रज्ञान मागे पडले तरी मुके प्राणीही मदतीचे ठरतात. याचाच प्रत्यय हुक्केरी तालुक्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी झालेल्या मेंढपाळाच्या खुनाचा उलगडा झाला असून बकऱ्यांचे कळप व दोन कुत्र्यांनी दिलेल्या सुगाव्यामुळे खुनाचा उलगडा झाला आहे. लहान भावानेच मोठ्या भावाचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, पोलीस उपनिरीक्षक एस. के. मण्णीकेरी, श्रीशैल पुजेरी, एस. एम. चौगला, सतीश र•ाr, सुनील चंदरगी, एस. बी. हमानी यांचा समावेश असलेल्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला आहे.
बकऱ्यांचा कळप चारण्यासाठी सोडलेला रायाप्पा सुरेश कमती (वय 28), राहणार हट्टीआलूर, ता. हुक्केरी याचा 8 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास खून झाल्याचे उघडकीस आले होते. पाच्छापूरजवळ बकरी चारण्यासाठी सोडलेली असताना डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता. दुपारी 1.30 ते 6.30 यावेळेत ही घटना घडली होती. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांना खुनाचा उलगडा होईल, असा कसलाच पुरावा घटनास्थळी सापडला नाही. ना सीसीटीव्ही फुटेज ना टॉवर लोकेशन. काहीच सुगावा नव्हता. पंधरा दिवस उलटले तरी मेंढपाळाचा खून करणारा कोण? याविषयी पुसटशी माहितीही त्यांना मिळाली नाही. गावात स्थानिक माहिती गोळा करताना मिळालेल्या एका छोट्या माहितीवरून पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला आहे.
याप्रकरणी खून झालेल्या रायाप्पाचा लहान भाऊ बसवराज सुरेश कमती (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. रायाप्पा बसवराजला बकऱ्या चारण्यासाठी बोलावत होता. रात्री कळपात झोपण्यास सांगत होता. प्रत्यक्षात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बसवराजला काही तरी नोकरी करायची होती. भाऊ रायाप्पा मात्र आपल्याला बकऱ्यांच्या कळपात बोलावतो आहे यावरून दोन्ही भावंडांमध्ये वादंग सुरू झाले होते. या वादातूनच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला आहे. अत्यंत थंड डोक्याने मोठ्या भावाचा काटा काढल्याने पोलिसांनाही या प्रकरणाचा छडा लावण्यास तब्बल महिना लागला. खून झालेल्या रायाप्पाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डोक्यावर दगड घालण्यात आले होते. बसवराजने आपल्या घरातून मिरची पूड नेऊन भावाने आपल्याला ओळखू नये म्हणून त्याला मारण्याआधी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बसवराजला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
घटनास्थळावर पुन्हा एकदा केला प्रसंग उभा
रायाप्पाचा खून झाला, त्यादिवशी त्याच्या मृतदेहाजवळ दोन कुत्री ठाण मांडून होती. 60 बकऱ्यांच्या कळपाने मात्र घर गाठले होते. मेंढपाळाच्या खुनानंतर बकऱ्या कशा घरी पोहोचल्या? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी घटनास्थळावर पुन्हा एकदा प्रसंग उभा केला. 60 बकऱ्या जेथे रायाप्पाचा खून झाला होता तेथे बसविण्यात आल्या. त्याच्याजवळच दोन्ही कुत्रीही बसवली. जेथे रायाप्पाचा मृतदेह पडला होता, तेथे बसवराजला झोपायला सांगितले. किती उशीर झाला तरी बकरी तेथून हलली नाहीत, कुत्रीही हलली नाहीत. मग रायाप्पाचा खून झाला, त्यावेळी बकऱ्यांचा कळप घरी कसा पोहोचला? असा प्रश्न उपस्थित झाला. ज्या शेतवाडीत मृतदेह आढळून आला, तेथून जवळच कालवा गेला आहे. घरी पोहोचण्यासाठी बकऱ्यांना कालवा ओलांडावा लागतो. कोणीतरी घेऊन गेल्याशिवाय बकऱ्या घरी पोहोचल्या नाहीत आणि त्यांना नेणारा हा घरातीलच असणार, या संशयाने स्थानिक चौकशी वाढविण्यात आली. त्यावेळी बसवराज व रायाप्पा यांच्यातील वाद व भांडण पोलिसांना समजले. पोलिसांनी बसवराजला बोलावून त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. आपण पोलिसांच्या हाती सापडू नये, याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती. भावाचा खून करण्यासाठी निघण्याआधी मोबाईल घरीच ठेवला होता. बकऱ्यांचा कळप आणि कुत्र्यांनी आपल्या धन्याच्या खुनाला वाचा फोडलीच.