कडक उन्हामुळे पाऊस हवा, पण हुलकावणीच!
पश्चिम भागात रविवारी पावसाचा शिडकावा : वीट व्यावसायिक चिंतेत, उष्णतेमुळे नागरिक हैराण
वार्ताहर/किणये
तालुक्यात कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे सारेजण लाहीलाही करू लागले आहेत. या कडक उन्हामध्ये पाऊस हवा. दमदार पाऊस झाल्यास हवामानात थोडाफार गारवा निर्माण होऊ शकतो. मात्र रविवारीसुद्धा तालुक्याच्या पश्चिम भागात केवळ पावसाची रिमझिम झाली आणि पावसाने हुलकावणीच दिली. अलीकडे तालुक्यात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे सारेजण हैराण झालेले आहेत. शनिवारी व रविवारी तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. यामुळे नागरिकांची आशा पल्लवीत झाली होती. कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास हवामानात गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र रविवारीसुद्धा पाऊस केवळ रिमझिम प्रमाणातच झाला.
कच्च्या विटांना धोका
या ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी भागातील विविध व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात सध्या वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कच्च्या विटा अधिक प्रमाणात तयार करण्यात आलेल्या आहेत. तसेच विटांच्या भट्ट्याही लावण्यात आलेल्या आहेत. मात्र ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शिडकाव्यामुळे कच्च्या विटांवर प्लास्टिक व ताडपत्री टाकण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे.
दमदार पाऊस झाल्यास आंबा उत्पादनात वाढ
पश्चिम भागात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. सध्या काजूचा हंगाम जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास काजू उत्पादनात वाढ होऊ शकते, असे उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्याही नजरा या उन्हात पावसाकडे लागून राहिलेल्या आहेत. दमदार पाऊस झाल्यास आंबा उत्पादनात वाढ होणार आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे. सध्या एखादा दमदार पाऊस होणे गरजेचे आहे,असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.