साखर उद्योगाच्या विनियंत्रणेमुळे...
अलीकडेच ऊसाची बियाणे तयार करण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे. यामुळे 30 ग्रॅम बियाणामध्ये एक एकरामध्ये ऊसाची पेरणी होऊ शकते. हा एक नवोन्मेष आहे. यामुळे ऊस धंद्यामध्ये क्रांती घडून येईल. बदलत्या तंत्रज्ञानाच्या ताकदीवर भविष्यातील शेती वेगळ्या दिशेकडे घेऊन जाता येते.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पीक ऊस आहे. म्हणून या भागाला ऊस पीक पट्टा म्हणतात. या भागात बऱ्याच साखर कारखान्यांचे जाळे आहे. त्यामुळे शेती व्यवस्थेला एक प्रकारची बरकत आलेली आहे. एक पीक प्रवृत्ती वाढीस लागली आहे. शेत जमिनीचे क्षारीकरण आणि चिबडपणा वाढत आहे हे खरं म्हणजे ऊसाबाबतीतील अज्ञान कारणीभूत आहे. अमाप रासायनिक खते आणि अमाप प्रवाही पाण्याच्या वापरामुळे निचरा नसलेल्या भागात क्षारीकरण प्रक्रिया झपाट्याने वाढत आहे. याला शेतातील पाण्याचा निचरा हा एकमेव उपाय आहे. यासाठी शासन, कारखाने आणि संस्था पुढाकार घेऊन क्षारीकरणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. पण शेतकऱ्यांना ऊस शेतीबद्दल प्रबोधन केले जात नाही. सिंचन जलवितरण प्रणाली विकसित होऊ शकत नाही. सूक्ष्म सिंचन साधनांचा वापर केला जात नाही. मायक्रो न्युट्रिएंटचा वापर करून आवश्यक अन्न द्रव्ये देण्याचे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे ऊस पीक पट्ट्यातील शेतकऱ्यांना दोष दिला जातो. शक्य असूनही आवश्यक ती कृषी प्रणाली विकसित होऊ शकत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
ऊस पिकाचा प्रत्येक भाग औद्योगिक वापराचा आहे आणि औषधी घटकांचा आहे. शेत जमिनीला रिसायकल पद्धतीने मातीचा आणि जमिनीचा कस वाढविणारा आहे. त्यासाठी प्रस्थापित पीक व्यवस्थापन पद्धती बदलावी लागते. ऊस पिकाच्या कापणीनंतर पाचट न जाळता तो मातीत गाडून टाकता येतो. त्यामुळे एकरी सहा टन सेंद्रिय खत उपलब्ध होते.
ऊस पिकाची शरीर रचना, त्याची वैशिष्ट्यो आणि कार्य पद्धती समजून घेतली पाहिजे. उसाच्या मुळांना आणि पानाला कार्बनची गरज असते. ते योग्य प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. सीओ 2 आणि एच 2 ओ च्या संयोगाबरोबर सूर्यप्रकाशाच्या संयोगातून फोटो सिन्थेसिसद्वारे सुक्रोस तयार होते आणि ते ऊसाच्या कांडीतील मध्यभागी असलेल्या नलिकेद्वारे खालून साखर भरून येत असते. एखाद्या कांडीत साखर भरून झाल्यानंतर त्या कांडीला चिकटून असलेला पाला वाळतो. ही प्रक्रिया सुमारे 12-13 महिने घडत असते. डिसेंबरच्या शेवटी ढासं वारा सुरु झाला की, ऊस परिपक्व होऊ लागतो. उसातील साखरेचा उतारा वाढतो. याचे गौडबंगाल अद्याप उकललेले नाही. एका उसामध्ये त्याच्या वजनाच्या 5 ते 6 टक्के साखरेचा अंश असतो. तो 18 टक्क्यापर्यंत वाढविता येतो, असे अलीकडे संशोधित झाले आहे. जी. एम. ऊसामुळे ही टक्केवारी 25 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
साखरेसाठीचा ऊस जैव इंधनासाठीचा उर्जा-ऊस जैव उर्जा निर्माण करणारी ऊसाची वाण अशी वर्गवारी यापुढे येऊ शकते. तेही जीएम तंत्रज्ञानाने, खाद्य साखरेला वगळून इतर प्रकारच्या ऊसासाठी जी. एम. तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे. पेट्रोल, डिझेल यामुळे हरितवायू निर्माण होतो. इथेनॉलसारख्या इंधनामुळे प्रदूषण स्थिती निर्माण होत नाही. म्हणून फ्लेक्स इंजिनाच्या निर्मितीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. आता तर पॉली लॅक्टिक अॅसिडची निर्मिती शक्य झाली आहे. यामुळे बायो प्लास्टिकची निर्मिती होऊ शकते. तिच्या कंपोस्टींग गुणधर्मामुळे प्लास्टिकचे पोल्युशन होणार नाही.
पॉली प्लास्टिक अॅसिडची निर्मिती येत्या दोन वर्षात होऊ शकते. साखर कारखान्यांमधून सीएनजी अथवा सीबीजीच्या उत्पादनाची स्थिती सहज शक्य झालेली आहे. इथेनॉल व सीएनजीमुळे इंधन समस्या दूर होईल. परकीय चलन वाचविता येईल. उलट इंधन निर्यातीचा देश म्हणून भारताकडे जग बघेल. ही सामर्थ्ये अनेकवेळा सांगून देखील साखर कारखान्यांना समजत नव्हते, म्हणून सरकारी धोरणेही अंमलात येत नव्हती. धोरणातील दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये ऊस व्यवस्था अडकलेली होती. आता ती यातून मुक्त होताना दिसते. विना परवाना, बिना नियंत्रणातून ऊस व साखर धंदा विकसित होणे गरजेचे आहे. हळुहळू या धंद्यावरची दोरी सैल होताना दिसते. पण ही अक्कल यायला तीस वर्षे मागे जावे लागले. तीस वर्षापूर्वी याची जाणीव करून दिली होती. (7 व्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेतील अध्यक्षीय भाषण) पण कोण लक्षात घेतो? धनंजय गाडगीळानंतर सहकारातील प्रेरणा नष्ट झाली आहे. सहकारी नेतृत्व आणि घराणेशाहीने सहकारी चळवळ उध्वस्त केली आहे. एखाद्या भागाच्या विकासासाठी सहकारी चळवळीच्या विकासाचे राजकारण झाले आणि आता राजकारणाचा विकास सहकारी चळवळीच्या माध्यमातून होताना दिसतो. हे संख्यात्मक संरचनेच्या अधोगतीचे कारण आहे.
ऊस पिकाचा पाला जेवढा रुंद तेवढा फोटोसिन्थेसिसला गती मिळते. साखर अधिक प्रमाणात तयार होते. सूर्यप्रकाश हे उसाचे मुख्य अन्नद्रव्य आहे. वादळी पावसामध्ये वीजा कडाडतात. त्यातून असंख्य मेगावॅट उष्णता बाहेर पडते ती ऊर्जा परिसरातील पिकांना, झाडांना मिळते, म्हणून ते जास्त तजेलदार बनतात. अशी ऊर्जा ऊस पिकाला आवश्यक असते. ऊस पिकाला सौर उर्जा भरपूर प्रमाणात मिळाली पाहिजे, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. उदाहरणार्थ उसाची लावण दक्षिण-उत्तर सयामधून केल्यास ऊस पिकाला सकाळ-दुपार अधिक सौर ऊर्जा थेट स्वरुपात मिळू शकते. तसेच सूर्य किरणे उसाच्या मुळापर्यंत गेल्यास अधिक चांगले असते.
ऊसाचा पाला आकाशाकडे थेट सरळ दिशेत असेल तर त्याला सौर ऊर्जा कमी मिळते. तोच पाला 60 अंशाच्या कोनांनी जमिनीकडे वाकलेला असेल तर त्या पाल्याला अधिक सूर्य प्रकाश मिळतो. त्यामुळे सुमारे 20 ते 25 टक्के खत कमी लागते, असे अलीकडेच संशोधनांनी सिद्ध केलेले आहे. हे कटाक्षाने शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजे. याबाबतीत कोणत्याच कारखान्याकडे आर अॅण्ड डी विभाग अस्तित्वात नाही. ऊस विकास विभाग नाममात्र आहे.
ऊसाच्या पाल्यामध्ये औद्योगिक वापराचे अनेक अंश आहेत. साखर निर्मितीबरोबर बगॅस मोलॅसिस, प्रेस मड, पेंट वॉश यासारखे उपपदार्थ तयार होतात. त्याद्वारे इथेनॉल, रिक्टफाईड स्पिरिट, इ. एन. ए., अल्कोहोल अॅसॅटिक अॅसिड, अॅसिटोन, सी. बी. जी आणि सी. एन. जी., हैड्रोजन, सीओर, वीज उत्पादन, प्लास्टिकचे उत्पादन अशी सुमारे 27 उत्पादने तयार केली जाऊ शकतात. सध्या केवळ साखर तयार करून अनेक अव्यक्त सामर्थ्ये व्यर्थ वाया जात आहेत. हे दरिद्री लक्षणच म्हणावे लागेल.
अलीकडेच ऊसाची बियाणे तयार करण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे. यामुळे 30 ग्रॅम बियाणामध्ये एक एकरामध्ये ऊसाची पेरणी होऊ शकते. हा एक नवोन्मेष आहे. यामुळे ऊस धंद्यामध्ये क्रांती घडून येईल. बदलत्या तंत्रज्ञानाच्या ताकदीवर भविष्यातील शेती वेगळ्या दिशेकडे घेऊन जाता येते. निदान यापुढे तरी ऊस विकासावर भर देऊन नेमकं काय उत्पादन करणे परवडते ते निश्चित करून कारखानदारी प्रक्रियेमध्ये लवचिकता आणली पाहिजे. जी. एम. तंत्रज्ञानाने तणनाशके आली. तसेच पिकांचे अनेक वाण व्यवहारात आलेले आहेत. यापुढेही येतील. शेतकरी मात्र शहाणा झाला पाहिजे, ही काळाची गरज आहे. ऊस उद्योगातील हे परिवर्तन खुलेकरण आणि उद्योगावरच्या विनियंत्रणामुळे झाले, ही वस्तुस्थिती आहे.
डॉ. वसंतराव जुगळे