For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूधगंगा ओसरतेय, कृष्णेची पातळी जैसे थे

11:46 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
दूधगंगा ओसरतेय  कृष्णेची पातळी जैसे थे
Advertisement

पूरस्थिती कायम : अनेक मार्ग पाण्याखाली : धरणांतून होत असलेल्या विसर्गाचा परिणाम

Advertisement

वार्ताहर /एकसंबा

पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोयना, वारणा, काळम्मावाडी, राधानगरी, कण्हेर यासह प्रमुख धरण व लघु प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. मंगळवारी दूधगंगा नदीची पातळी किंचित ओसरली असून कृष्णा नदीची पाणीपातळी जैसे थे स्थितीत आहे. पाणीपातळी ओसरण्यास सुरुवात झाल्याने स्थलांतरित कुटुंबांची संख्या कमी झाली आहे. परिणामी दूधगंगा व वेदगंगा काठावरील काही स्थलांतरित कुटुंबे परतीच्या मार्गावर जात आहेत. कृष्णा नदीकाठी मात्र पूरस्थिती कायम असल्याचे पहावयास मिळत आहे.

Advertisement

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस व धरणांतून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा व दूधगंगा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली. हजारो कुटुंबीयांना घरे सोडून स्थलांतरित व्हावे लागले. नद्या इशारा पातळी ओलांडल्यानंतर धाकधूक वाढली होती. पण पावसाचे प्रमाण कमी झाले अन् झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी ओसरू लागली. गेल्या तीन दिवसांपासून पाणी कमी होणार असे वाटत होते. पण कृष्णा नदीची पाणीपातळी वाढतच गेली. यामुळे पूरस्थिती बिकट झाली होती. मंगळवारी मात्र काहीसा दिलासा मिळाल्याचे पहावयास मिळाले.

कृष्णा नदीची पाणीपातळी 536.62 मीटरवर स्थिर असून दूधगंगा नदीची पाणीपातळी 537.700 मीटर होती. काहीअंशी दूधगंगा नदीची पाणीपातळी घटली आहे. राजापूर बंधाऱ्यातून 2 लाख 49 हजार 391 क्युसेक पाणी येत आहे. दूधगंगा नदीतून 47 हजार 520 क्युसेक पाणी येत आहे. एकूण कल्लोळ कृष्णा नदीत 2 लाख 96 हजार 911 क्युसेकने पाणी येत होते. राजापूर बंधाऱ्यातून येणारे पाणी 5792 क्युसेकने वाढले आहे. तर 1050 क्युसेकने दूधगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह घटला आहे. कल्लोळ येथे कृष्णा नदीच्या प्रवाहात 4742 क्युसेकने वाढ झाली असली तरी विस्तारलेल्या पाण्याची पातळी स्थिर आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणात 35 हजार 402 क्युसेक इतक्या पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणातून अद्यापही 32 हजार 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तसेच वारणा धरणातून 8092 क्युसेकने विसर्ग, कण्हेर धरणातून 4611 क्युसेकने विसर्ग, काळम्मावाडी धरणातून 8100 क्युसेकने विसर्ग, राधानगरी धरणातून 4356 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. आलमट्टी धरणात 67.859 टीएमसी पाणीसाठा असून 53.13 टक्के धरणात पाणीसाठा आहे. 3 लाख 2 हजार 573 क्युसेकने पाण्याची आवक होत असून 3 लाख क्युसेकने विसर्ग होत आहे.

पाणलोट क्षेत्रातील धरणाचा पाणीसाठा पाहता कोयना 82 टक्के भरले आहे. धोम 83 टक्के भरले आहे. कण्हेर धरण 83 टक्के धरण भरले आहे. वारणा धरण 85 टक्के धरण भरले आहे. काळम्मावाडी धरण 86 टक्के भरले आहे.  राधानगरी धरण 99 टक्के धरण भरले आहे. पाटगाव प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता कोयना 107 मि.मी., वारणा 81 मि.मी., काळम्मावाडी 65 मि.मी., राधानगरी 100 मि.मी., पाटगाव 80 मि.मी., महाबळेश्वर 158 मि.मी., नवजा 99 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर चिकोडी तालुक्यातील पावसाचे प्रमाण पाहता चिकोडी विभाग 1.5 मि.मी., अंकली विभाग 0 मि.मी., नगरमुन्नोळी विभाग 3.2 मि.मी., सदलगा विभाग 0 मि.मी., जोडट्टी विभाग 2.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.