दुहेरी नागरिकत्वावर बंधन आणू नये : लुईझिन फालेरो
पाँडेचेरीत 50 टक्के लोकांना दुहेरी नागरिकत्व तर गोव्याला का नाही?
प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्य हे देशातील अगदी लहान राज्य आहे. या राज्याने पोर्तुगीजांचा अन्याय, अत्याचार सहन केला आहे. अशा काळात काही नागरिकांचे स्थलांतर झालेले आहे. संपूर्ण जगात 60 ते 70 टक्के जनतेला दुहेरी नागरिकत्वाचा अधिकार आहे. भारतातील पाँडिचेरीतील 50 टक्के लोकसंख्येलाही दुहेरी नागरिकत्वाचा अधिकार आहे. मग हा अधिकार गोव्याला का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत गोव्यातील नागरिकांवर दुहेरी नागरिकत्वाबाबत बंधन आणू नये. त्यांनाही दुहेरी नागरिकत्वाचा अधिकार मिळायलाच हवा, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री तथा माजी राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी मांडले.
पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फालेरो यांनी सांगितले की, गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्वाचा अधिकार हा कायम रहावा, तो हिरावून घेतला जाऊ नये यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यातील विद्यमान सरकारने इतर देशांचा व पाँडिचेरीचा आदर्श घेऊन हा अधिकार लोकांपासून हिरावून घेऊ नये, असेही ते म्हणाले.
जगातील सर्व प्रगत देश त्यांच्या नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाची सुविधा देत आहेत. जे लोक दुहेरी नागरिकत्वाच्या आधारे परदेशात आहेत. त्यामध्ये गोमंतकीयांची संख्या अधिक आहे. हे लोक त्या ठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास आहेत, हे विसरता कामा नये. ते दुसऱ्या देशात आहेत, म्हणून भारताची व गोव्याची अस्मिता व प्रेम कमी होणार नाही. त्यांची भारत देशाशी अजूनही नाळ जुळलेलीच आहे. म्हणून त्यांना हा दुहेरी नागरिकत्वाचा अधिकार मिळायलाच हवा, असेही ते म्हणाले.
लोकसभा लढविण्यात रस नाही
आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता माजी खासदार लुईझिन फालेरो यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत आपणाला कोणताच रस नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच वातावरण निर्मिती देशात झालेली आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्रीपद, केंद्रातील महत्त्वाची पदे व राज्यसभा खासदार म्हणूनही काम केले आहे. अनुभव मोठा असला तरी तूर्तास लोकसभा निवडणूक लढविण्याबाबाबत आपण तयार नसल्याचे फालेरो यांनी सांगितले.