जोरदार पावसाने ड्रेनेज-गटारींची समस्या चव्हाट्यावर
दुकानात शिरले पाणी, व्यावसायिकांना फटका, गटारी तुंबल्या
बेळगाव : जोरदार पावसाने पाणी साचून शहर जलमय झाले आहे. विशेषत: ड्रेनेज आणि गटारींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्याचा निचरा थांबल्याने अनेक दुकानातून पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यावसायिकांनाही लाखो रुपयांचा फटका बसला आहे. विशेषत: फोर्टरोड, जुना पीबी रोड येथे पाणी साचल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. महानगरपालिकेमार्फत केवळ तात्पुरती स्वच्छता मोहीम राबवून तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणीही स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे. शहरात मागील आठ दिवसांपासून पावसाचा जोर कायम सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा थांबल्याने स्थानिक व्यावसायिक आणि रहिवाशांची झोप उडाली आहे. गटारीतून प्लास्टिक, कचरा, कपडे, रबर आणि इतर टाकावू वस्तू अडकून राहिल्याने निचरा थांबला आहे. त्यामुळे अनेक दुकाने, ऑटो गॅरेज आणि स्पेअरपार्टच्या दुकानामध्ये पाणी शिरले आहे. काही दुकानांमध्ये मागील दोन दिवसापासून गुडघाभर पाणी कायम आहे. परिणामी दुकानातील साहित्य खराब होऊन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाने साऱ्यांना 2019 च्या पावसाची आठवण करून दिली आहे.