न्यायालयात धाव घेण्यास घाबरू नका: सरन्यायाधीश
राज्यघटना दिन कार्यक्रमाला केले संबोधित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत ‘लोकांचे न्यायालय’ म्हणून काम केले आहे. नागरिकांनी न्यायालयात येण्यास घाबरू नये तसेच याकडे अंतिम पर्याय म्हणूनही पाहू नये असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यघटना दिन कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले आहे.
राज्यघटना लोकशाहीच्या संस्था आणि प्रक्रियांद्वारे आम्हाला राजकीय मतभेद संपुष्टात आणण्या मदत करते, त्याचप्रकारे न्यायालयीन प्रणाली आम्हाला स्थापित सिद्धांत तसेच प्रक्रियांद्वारे अनेक प्रकारच्या असहमती दूर करण्यास मदत करते. याचमुळे न्यायालयात प्रत्येक खटला संवैधानिक शासनाचा विस्तार असल्याचे आम्ही म्हणू शकतो असे उद्गार सरन्यायाधीशांनी काढले आहेत.
राज्यघटना कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाद्वारे झाली. कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव किशन कौल, संजीव खन्ना उपस्थित होते. याचबरोबर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर अनेक महनीय उपस्थित होते.
मागील 7 दशकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकांचे न्यायालय म्हणून काम पेले आहे. हजारो लोक या संस्थेत न्याय मिळणार या विश्वासासोबत याच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. वैयक्तिक स्वातंत्र्य, उत्तरदायित्व, बेकायदेशीर कारवाई, आदिवासी स्वत:च्या भूमी सुरक्षेसाठी, मैला हाताने वाहून नेण्यासारख्या सामाजिक कुप्रथा संपुष्टात आणण्यासाठी आणि स्वच्छ हवा प्राप्त करण्यासाठी हस्तक्षेप करण्याच्या अपेक्षेसह नागरिक न्यायालयात धाव घेत असतात. हे खटले केवळ न्यायालयासाठी आकडे नाहीत. तर लोक सर्वोच्च न्यायालयाकडून कोणत्या अपेक्षा करतात हे यातून दिसून येत असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले