अपहरणाच्या कॉल्सना घाबरु नका
मुख्यमंत्री, पोलिसांकडून जनतेला आवाहन
पणजी : गोव्यात सध्या विद्यार्थ्यांच्या पालकांना येणाऱ्या बनावट कॉल्सना ऊत आला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालकांमध्ये वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सदर कॉल्स हे फसवे असून कुणीही घाबरून जाऊ नयेत, तसेच या कॉल्सना बळी पडून कुणाच्याही खात्यावर पैसे भरू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. तुमच्या फोनवर आलेला अनोळखी कॉल आणि खास करून तो जर 92या कोड क्रमांकाने प्रारंभ होणारा असेल तर मुळातच तो उचलू नका. तरीही उचललाच आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने ‘तुमच्या मुलाचे अपहरण वगैरे झाल्याचे सांगितल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. असे कॉल्स आल्यास सर्वप्रथम आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची पडताळणी करा, तसेच संशय आल्यास पोलिसांना कळवा’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
सायबर गुन्हे विभाग सक्रिय
पोलिसांच्या सायबर क्राईम सेलनेही हे प्रकार गांभीर्याने घेतले असून पालकांनी घाबरून अस्वस्थ होऊ नये, असे कळविले आहे. अनेक पालकांना (92) कोडवरून कॉल येऊ लागले आहेत. मात्र ते फसवे असून असे फोन कोणीही उचलू नयेत. तसेच अशाप्रकारे आलेल्या कॉल्सवरून पैशांची मागणी झाल्यास ते देऊ नयेत. त्याचबरोबर असा एखादा कॉल आल्यास ‘चक्षू’ पोर्टलवर तक्रार नोंदवा, असे सायबर गुन्हे पोलीस अधीक्षकांकडून कळविण्यात आले आहे.