सदऱ्यावरही नाव लिहून घ्यावे का?
नेमप्लेट वादावर केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने कांवड यात्रेच्या मार्गावरील दुकानदारांना बोर्डावर नाव लिहिण्याचा आदेश दिल्यावर राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांसोबत रालोआतील घटक पक्षांनी देखील राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. संजद, लोजपनंतर आता रालोदने देखील या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. कांवड यात्रेकरूंची सेवा सर्वजण करतात. कांवड घेऊन जाणारा व्यक्ती यापैकी कुणाचीच ओळख पटवत नसल्याचे वक्तव्य रालोद प्रमुख तसेच केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी केले आहे.
कांवड यात्रेकरून जात-धर्म विचारून सेवा स्वीकारत नाही. या मुद्द्याला धर्माशी जोडले जाऊ नये. राज्य सरकारने संबंधित निर्णय विचारपूर्वक घेतलेला नाही. आता या निर्णयावर सरकार ठाम राहू पाहत आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारकडे अद्याप वेळ आहे. आता स्वत:चे नाव कुठे-कुठे लिहून घ्यावे. स्वत:च्या सदऱ्यावर नाव लिहून घ्यावे का आणि नाव पाहून हस्तांदोलन करावे का असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
योगी सरकारचा आदेश
योगी सरकारने कांवड मार्गावरील दुकाने तसेच हॉटेल्सना एक आदेश जारी केला आहे. सर्व दुकाने, हॉटेल्सनी स्वत:च्या मालकाचे नाव ठळकपणे बोर्डावर नमूद करावे. पूर्ण उत्तरप्रदेशात कांवड मार्गावर खाण्यापिण्याच्या दुकानांवर नेमप्लेट असणे आवश्यक आणि दुकानांवर संचालक मालकाचे नाव आणि ओळख नमूद असावी. कांवड यात्रेकरूंच्या श्रद्धेचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हलाल प्रमाणन असलेल्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी असेल असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
आदेशाचा प्रभाव
पूर्ण कांवड मार्गावर उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या आदेशाचा प्रभाव दिसून येत आहे. ठिकठिकाणी दुकानांमध्ये मालकाच्या नावाचे फलक झळकले आहेत. यामुळे संबंधित दुकान आणि हॉटेलचा मालक कोण हे कांवड यात्रेकरूंना समजत आहे. या निर्णयाला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होत आहे.